पेण तालुक्यातील वसई फाट्याजवळ जनावरांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पेण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी रात्री वरसई परिसरातून ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी दोन चारचाकी वाहनांमध्ये चार जनावरांना बेशुद्ध अवस्थेत कोंडून वाहतूक केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी शरीफ रफिक अन्सारी (२५), इम्रान मलंग पटेल (३६, मुंब्रा ठाणे), सलमान अब्दुल अहमद पटेल (३६), सोनू जुबेर खान (२२) आणि बाजल रशीद शेख (१९, पनवेल) या पाच आरोपींना अटक केली आहे. तर अजित शेख (रा. तळोजा) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाई संदर्भात स्वप्निल गजानन म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.