BSNL ने Viasat कंपनीच्या सहकार्याने भारतातील दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी पुरवण्यासाठी पहिली “Satellite-to-Device” सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून ती डोंगराळ आणि दुर्गम भागातही स्थिर नेटवर्क देऊ शकते.
आजही भारताच्या अनेक भागांत Jio, Airtel, Vodafone-Idea सारख्या कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क पोहोचलेले नाही. ज्यामुळे तेथील लोकांना टेलिकॉम कनेक्शनचा लाभ घेता येत नाही. यापासून ते वंचित राहतात. असे साधारणपणे डोंगराळ आणि जंगली भागात घडते. लोकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी, BSNL ने भारतात प्रथमच सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवा सुरू केली आहे. याच्या सहाय्याने लोक फोन नेटवर्कशिवायही टेलिकॉम कनेक्टिव्हिटीचा वापर करू शकतील.
महत्वाचे म्हणजे, “सॅटेलाइट-टू-डिव्हाइस” सेवेची चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती विविध आव्हानात्मक भागांतही स्थिर कनेक्शन प्रदान करण्यास सक्षम आहे, असे बीएसएनएलने म्हटले आहे. तसेच, दूरसंचार विभागाने (DoT) ‘X’ वर पोस्ट करत यासंदर्भात घोषणा केली आहे. “BSNL चे हे नवे पाऊल भारतात सॅटेलाइट कम्युनिकेशन सर्वसामान्य जनतेसाठी सोपे आणि सुलभ बनवेल.”
ही सेवा इमरजन्सी कॉल्स, SOS मॅसेजेस आणि UPI पेमेंट्ससाठी उपयुक्त ठरेल. मात्र, सामान्य कॉल्स आणि SMS साठी सेवा उपलब्ध होईल की नाही, याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. BSNL ने म्हटले आहे की, या सेवेने भारतातील सॅटेलाइट कम्युनिकेशन अधिक सुलभ होईल.