पेण ( राजेश प्रधान ) : केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला हिट अँड रन कायद्यामध्ये वाहन चालकाला दोषी धरण्यात येत असल्याने या कायद्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत महाराष्ट्र वाहतूक सेना आक्रमक झाली आहे. या कायद्याला देशातील वाहन चालकांचा विरोध असून वाहन चालकांना दोषी ठरवणारा कायदा मागे घ्या अथवा त्यात वाहन चालकांना दोषी धरून केलेल्या तरतुदी रद्द करा अशी मागणी शिवसेना वाहतूक सेनेच्या वतीने पेण येथे करण्यात आली.
केंद्र सरकारने वाहन मालक-चालकांवर रस्ते अपघात संदर्भात नवीन कायदा प्रस्तावित केला असून या कायद्यामध्ये वाहन चालकाला सात वर्ष तुरुंगवास व दहा लाख रुपये दंड आकारण्यात येणार असल्याने या कायद्याविरोधात देशातील वाहन चालक मालक संतप्त झाले आहेत.
रस्त्यावर वाहन चालवताना अपघात घढण्याकरिता अनेक गोष्टी कारणीभूत असतात रस्त्यावर असलेले मोठमोठे खड्डे, अडथळे, रस्त्यावर सांडलेली वाळू, ऑइल तसेच समोरून येणाऱ्या वाहन चालकाने तोडलेला सिग्नल अथवा उभ्या वाहनावर पाठीमागून येऊन धडकणे यासह इतर अनेक कारणे कारणीभूत असतात. परंतु त्याचा सारासार विचार न करता केंद्र सरकारने वाहन चालकाला दोषी धरूनच हा जुलमी कायदा तयार केला आहे. तो कायदा केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावा किंवा त्यातील जाचक तरतुदी काढून टाकाव्या अशी मागणी यावेळी वाहतूक सेनेचे दिलीप पाटील यांनी केली.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेने अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्यअध्यक्ष अशोक टावरे यांच्या आदेशानुसार वाहतूक सेनेचे जिल्हाअध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संदेश यादव, तालुका अध्यक्ष राजू पाटील, तालुका सह संपर्कप्रमुख बी. एच. पाटील, उपतालुकाप्रमुख लवेंद्र मोकल यांनी पेणचे प्रभारी तहसीलदार प्रसाद कालेकर यांच्याकडे निवेदन देऊन या कायद्यासंदर्भात हरकत घेतली आहे यावेळी टेम्पो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.