मागील दोन ते तीन महिन्यांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ झाल्याचे चित्र दिसत असतांनाच सुकेळी खिंडीजवळ खैरवाडी गावाच्या समोर अंत्यत धोकादायक वळणावरती ज्या ठिकाणी तीन ते चार महिन्यांपासून जवळपास १५ ते २० अपघात झालेल्या ठिकाणीच ऐन गणेशोत्सवाच्याच दिवसात रविवार दि. ३१ आॅगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कंटेनरला अपघात होऊन कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. यामध्ये चालक गंभीररित्या जखमी झाला. सुदैवाने ज्या ठिकाणी कंटेनर पलटी झाला त्या ठिकाणाहून कोणतेही दुसरे वाहन जात नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
याबाबतीत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मुंबई -गोवा महामार्ग ६६ वरुन महाड बाजुकडुन पनवेलच्या दिशेने रसायन घेऊन जाणारा कंटेनर क्रं एम. एच. ४८ ए. जी. ८०७० चालक घनशाम चंद्रप्रकाश तिवारी( वय- २९) रा. लखनऊ, उत्तर प्रदेश याचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी सरळ दुभाजकावर धडकली. त्यामुळे रसायनने भरलेला कंटेनर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. या अपघाताची भीषणता ईतकी भयंकर होती की जर का त्या ठिकाणाहून एखादे दुसरे वाहन गेले असते तर त्या वाहनाचा कंटेनरखाली जाऊन चक्काचूर झाला असता.
तसेच सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा सण सुरू असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्यामुळे या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी देखिल झाल्यामुळे याचा नाहक त्रास देखिल गणेशभक्तांना सोसावा लागला. या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी आपल्या कर्मचाऱ्यांसह तसेच वाकण टॅबचे सर्व कर्दमचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजुला करुन वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली .
दरम्यान या अंत्यंत धोकादायक असलेल्या अपघातग्रस्त ठिकाणी अपघात रोखण्यासाठी लवकरात लवकर काही तरी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे करीत आहेत.