हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असुन अक्षरशः दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी देखिल पावसाने नागोठणे विभागामध्ये एकदम धुवांधार बॅटिंग केली. सोमवार ( दि.१८) रोजी सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत होता. पंरतु दुपारनंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अंबा नदिला पुराचे स्वरुप येऊन तामसोली येथिल पुलावरुन पाणी गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला.
नागोठणे परिसरासह सुकेळी, वाकण, खांब, कोलाड या ठिकाणी जोरदार पाऊस होऊन सगळीकडेच पाणीच पाणी झाले होते.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याला तळावाचे स्वरुप आले होते. वाकण पुलाजवळ तसेच महामार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे पाण्यातुन वाट काढतांना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
दरम्यान तामसोली पुलावरुन पाणी गेल्यामुळे वाकण – पाली मार्गावरील तामसोली थांब्यापासुन तामसोली येथे जाणा-या ग्रामस्थांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना ऐनघर – हेदवली मार्गे तामसोली या ठिकाणी लांबीचा प्रवास करावा लागला.