रायगड जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून अनेक डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. नागोठणे परिसरातील सुकेळी, भिसे खिंड, खांब, वाकण आदी डोंगरांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत चाललेले असुन याबाबतीत वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याचे जाणवत आहे. त्यातच वातावरणातील या वाढत्या उष्णतेमध्येच रायगड जिल्ह्यातील अनेक डोंगरांमध्ये वणवे लावल्यामुळे या लावलेल्या वणव्यात जंगलामध्ये सगळीकडेच मोठ्या प्रमाणात पालापाचोळा व सुकलेल्या झाडांच्या पानांचा खच पडलेला असल्यामुळे वा-याच्या प्रचंड वेगाने आग सर्वत्र पसरल्यामुळे या वणव्यात नैसर्गिक वनसंपदेचे मोठे नुकसान होत असुन वन्य प्राण्यांना देखिल आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.
वणव्यांचे प्रमाण वाढण्याचे नक्की कारण काय? वणव्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल का? अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. याबाबतीत वनखात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने गांभीर्याने लक्ष घालून वणव्यांचे प्रमाण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.