कर्जत तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीपात्रात वाहून आलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा मृतदेह मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सापडला. ही माहिती स्थानिकांनी कर्जत पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप भोसले आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
मृत महिलेची ओळख विजया अनिल काळोखे (वय ५०) अशी पटली असून त्या कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ सोसायटीमध्ये राहत होत्या. विशेष म्हणजे विजया काळोखे यांच्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात त्यांच्या पती अनिल काळोखे यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार याआधीच दाखल केली होती.
विजया काळोखे यांच्या पतीने नुकतीच सेवा निवृत्ती घेतली असल्याचे बोलले जात आहे. सदर मृत्यू संदर्भात अधिक तपास कर्जत पोलीस करीत असून, मृत्यूची नेमकी कारणमीमांसा शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.