जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील राज्य परिवहन आगारात गुरुवारी रात्री घडलेली घटना चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. आगारातील कॅन्टीनचा स्लॅब अचानक कोसळला, मात्र सुदैवाने त्या वेळी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अपघात टळला.
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय व अशासकीय कामांसाठी आगारात येत असतात. अनेक कर्मचारी, चालक, वाहक आणि प्रवासी येथे नियमित वावरत असतात. पण ही घटना रात्री उशिरा घडल्याने संभाव्य जीवितहानी टळली आणि मोठा अनर्थ वाचला.
प्राथमिक तपासात स्लॅबचे बांधकाम जुने असल्याने आणि दुरुस्तीची कामे वेळेवर न झाल्यामुळे हा भाग कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने सांगितले की, “या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र भविष्यात अशा प्रकारचा धोका निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक देखभाल, दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया हाती घेण्यात यावी अशी मागणी एस टी महामंडळाकडे करण्यात आली आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणी जुनी व जीर्णावस्थेतील इमारतींची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.