नागपूरात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. या घटनेत पोलिसांवरही हल्ले करण्यात आले असून, ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, ज्यामध्ये ३ डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शहरातील महाल परिसरात मोठ्या जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केली. १२ दुचाकी, १ क्रेन, २ जेसीबी आणि अनेक खासगी वाहनांचे नुकसान झाले. आंदोलकांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांवरही दगडफेक झाली, ज्यामुळे नागपूर पोलीस आयुक्त किरकोळ जखमी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हिंसाचाराला पूर्वनियोजित हल्ला म्हटले असून, पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. सध्या ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला असून, शहरात SRPFच्या ५ तुकड्या तैनात आहेत.
या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक करण्यात आली असून, सीसीटीव्ही आणि मोबाईल व्हिडिओच्या आधारे इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.