मुंबई -गोवा महामार्गावरील नागोठणे ते सुकेळी खिंड येथिल अपघातांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असुन याबाबतीत अद्यापही कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्यामुळे वाहन चालकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.
सुकेळी खिंडीमध्ये अपघातांची मालिका सुरू असतांनाच मंगळवार ( दि.१८) रोजी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर दुचाकीस्वार विनायक नथुराम पवार ,( वय- २७ ) रा. वहुर, ता.महाड हे आपल्या ताब्यातील के टी एम मोटरसायकल क्रं. एम. एच.०२ जी डी ६०९८ ही दुचाकी घेऊन पनवेल बाजुकडुन महाडच्या दिशेने जात असतांना खांब बाजुकडील सुकेळी खिंडीच्या उतारावर दुचाकी घसरून अपघात झाला.
या अपघातात विनायक यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असुन त्यांना तात्काळ वाकणं टॅबच्या वाहतूक पोलिसांनी जवळच असलेल्या जिंदल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जिंदल रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून माणगाव सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास कोलाड पोलिस स्टेशन करीत आहेत.