रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उष्णतेचा तडाखा; नागरिक हैराण

Dhagal
कोलाड (श्याम लोखंडे) : 
गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे आणि तापमानातील चढ-उतारामुळे उष्णतेचा जोर वाढला आहे. पहाटेचा गारवा आणि दिवसभर असह्य उकाडा यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
रविवार, सोमवार आणि मंगळवारी सकाळपासूनच उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक त्रासलेले दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील एक-दोन दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच, काही भागात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत पूर्व मोसमी पावसाची शक्यता
मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
राज्यात काही ठिकाणी गारपीटीचा इशारा
जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. बुधवारी पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणात वाऱ्यासह गडगडाटी पावसाचा अंदाज
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. यावेळी वारे प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वाहण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल सुरूच राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *