मागील काही वर्षांत येथील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केवळ व्होटबँके साठीच इथे व्यवसाय करण्यासाठी आलेल्या परिसरातील लोकांचे कायमस्वरूपी बस्तान मांडण्यास हातभार आणि सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळे या लोकांनी जवळजवळ प्रत्येक व्यवसायात आपले पाय घट्ट रोवले असून असेच परिसरातील लोंढे वाढण्याची परिस्थिती कायम राहिली तर स्थानिकांच्या व्यवसायासाठी धोक्याची घंटा असल्याचे जाणकार मंडळींमधून बोलले जात आहे.
याठिकाणी सद्यस्थितीत राजकीय लोकांच्या आशीर्वादाने परिसरातील लोकांच्या विविध ठिकाणी छोट्या छोट्या स्टोल्सचा कॅन्सर रुपी बस्तान स्थानिक पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या स्टोल्स धारकांना सोसावा लागत आहे. सुरुवातीला ज्यावेळी माथेरानला हे लोंढे सुरू झाले होते. त्यावेळी इथल्या काही स्थानिकांनी सुध्दा नेहमीप्रमाणे त्यांना सहकार्याची भूमिका पार पाडल्यामुळे हीच पूर्वी केलेली मदतीची भूमिका आता स्थानिकांच्या अंगलट आल्याची चर्चा आता स्वतः स्थानिकांमधूनच होत आहे. या छोट्याशा गावात व्यावसायिक दृष्टीने एकप्रकारे दहशत निर्माण केली जात असून आपणच याठिकाणी चार पिढ्यांपासून वास्तव्यास असल्याचा अविर्भाव व्यक्त करताना ही परिसरातील मंडळी प्रामुख्याने वावरताना दिसत आहेत.
स्थानिक लोक सुध्दा यास जबाबदार असून आजही अनेकांनी आपले लॉज भाडेतत्त्वावर देऊन मिळणाऱ्या भाडेपोटी रक्कमेवर समाधान मानत आहेत.अनेक ठिकाणी जंगलाची तोड करून घरे उभारली जात आहेत. याकडे मात्र वनखात्याने पूर्णपणे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे. चिरीमिरी साठी संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणानी हालचाली केल्या नाहीत तर स्थानिकांचा रोजगार आणि हे जंगल, वनराई अल्पावधीतच नष्ट करण्यासाठी ही परिसरातील मंडळी तत्पर आहेत. त्यांना या गावविषयी किंचितही सहानुभूती अथवा प्रेम नाही.
अशा ज्या स्वार्थी व्यक्ती आपल्या स्वतःच्या मतलबासाठी माथेरानची प्रतिमा मलिन करू पहात आहेत. आणि ज्यांच्यामुळे ऐन सुट्टयांच्या हंगामात सुध्दा इथल्या पर्यटन व्यवसायाला गळती लागली आहे. अशांना आगामी काळात जनतेने जागा दाखवून देणे गरजेचे बनले आहे. शून्य कार्य असताना आणि मुळात राजकारणाचा गमभन ज्ञात नसताना देखील नगरपालिका सभागृहात जाऊन पदे भूषविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या धूर्त राजकीय मंडळींचा आणि त्यांच्या लबाड राजकीय साथीदारांचा आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत कडेलोट होणे काळाची गरज आहे, अन्यथा हीच धूर्त राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी परिसरातील लोकांना निवडणुकीत उमेदवारी सुध्दा देऊ शकतात त्यामुळे भविष्यात वेळप्रसंगी स्थानिकांना गाव सोडून जाण्याची वेळ गलिच्छ राजकारणी आणू शकतात अशी भीती सुज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत.