महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि रोजगाराच्या संधींसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात ई-बाईक धोरण स्वीकारले जाईल आणि बाईक टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली तयार करण्यात येणार असून, पावसाळ्यात प्रवाशांना भिजण्यापासून वाचवण्यासाठी ई-बाईक पर्याय आणला जात आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश असून, या सेवेचे दर लवकरच ठरवले जातील.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सरकारने मोठी घोषणा केली असून, त्यांना दहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.
परिवहन विभागाच्या या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रात 20 हजार नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील, त्यातील 10 हजारांहून अधिक रोजगार फक्त मुंबईत तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारच्या या निर्णयामुळे रोजगार आणि वाहतुकीच्या सुविधांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.