बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या व्यापक हिंसाचारानंतर देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. या उठावानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला होता. दरम्यान, त्यांना धक्का देणारा निर्णय बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) दिला आहे.
सोमवारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यांच्या विरोधातील ४५८ पानांच्या निकालात निशस्त्र आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर देशभरात तणाव वाढला असून समर्थक आक्रमक होताना दिसत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
हसीना यांच्या समर्थकांकडून हिंसा किंवा जाळपोळ होऊ नये म्हणून बांगलादेश सरकारने कठोर पावले उचलली आहेत. संवेदनशील भागांत लष्कराच्या तुकड्या, पोलीस आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून गरज भासल्यास थेट गोळीबार करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.