परतीच्या पावसामुळे शेताकर्‍यांचे प्रचंड नुकसान

Bhat Sheti Peec

सुकेळी ( दिनेश ठमके ) :

गेले काही दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण रोहा तालुक्यासह नागोठणे,‌ सुकेळी परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. भातपिकांचे ऐन कापणीला सुरूवात होत असतांनाच या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व झालेले भाताचे पिक हे जमिनिवर पडुन पुन्हा त्याला कोंब येत आहेत. त्यामुळे अशा या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.
परतीचा पाऊस हा दरवर्षी असाच धुमाकूळ घालत असतो. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासुन हा पाऊस दुपारी किंवा सायंकाळी सुरू होतो. परंतु परिस्थिती कशीही असली तरी शेतीची कामे ही वेळेतच पुर्ण करावी लागतात. त्यामुळे काढणीला आलेल्या भातशेतीत पावसाचे पाणी साचल्यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. भाताच्या पुर्णपणे तयार झालेल्या लोंबी अक्षरशः शेतातील चिखलामध्ये पडुन पुन्हा कोंब येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतक-याला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
दरम्यान परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले भातशेतीचे नुकसान पाहता राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
—————————————–
 दरवर्षी परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे भातशेती करण्यासाठी केलेला खर्च देखिल निघत नसल्यामुळे यापुढे शेती करावी की नाही असा प्रश्न शेतक-यांपुढे पडला आहे.
 …वसंत भोईर – शेतकरी , कानसई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *