कर्जत ( गणेश पवार ) : २ जानेवारी १९४३ रोजी पहाटे बिटिश अधिकारी आर.ए. हॉल याच्या गोळीने कर्जतच्या मातीतील क्रांतिकारक यांच्या छातीचा वेध घेतला आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या क्रांतिकारकांनी जर बलिदान दिले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसते. धामोते, कोल्हारे हा भाग नागरिकीकरणामुळे वाढतो आहे. येथे नव्याने राहायला येणाऱ्या नागरिकांना इथला इतिहास माहित असायला हवा. त्याकरता धामोते येथे हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले त्यांचे सहकारी सदस्य व माजी सभापती अमर मिसाळ यांच्या माध्यमातून उभे करण्यात आले. तेव्हा हुतात्मा हिराजी पाटलांचे हे स्मारक युवापिढीला प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. धामोते येथे हुतात्मा हिराजी पाटलांच्या पुतळ्याचे आमदार थोरवे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी थोरवे बोलत होते.
कर्जत तालुक्याच्या मातीतील आजाद दस्त्यातील क्रांतिकारक हिराजी पाटील यांना १९४३ साली हौतात्म्य प्राप्त झाले. तर गेले अनेक वर्षे हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतीदिन साजरा केला जात होता मात्र त्यांची जन्मदिनांक माहीत नसल्याने त्यांची जयंती साजरी केली जात नव्हती. मात्र कर्जत तालुक्यातील इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी गेले अनेक वर्षे मोडी लिपिचा आधार घेत, अनेकांशी चर्चा करत २०१८ साली हुतात्मा हिराजी पाटील यांची जन्मदिनांक शोधून काढली. तेव्हा २०१८ सालापासून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम तालुक्यात साजरा करण्यात येतो.
यंदा कोल्हारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधत धामोते येथे चौकात हुतात्मा हिराजी पाटील यांचा अर्ध पुतळा बसवण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण कर्जत खालपूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज दिनांक १९ जानेवारी रोजी करण्यात आले. तर यासह कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे पाउणेतीन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन देखील आमदार थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर आमदार महेंद्र थोरवे, आगरी समाज संघटना कर्जत तालुकाध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती अमर मिसाळ, अरविंद पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश शेळके, मिलिंद विरले, तालुका संघटक शिवराम बदे, तालुका सचिव अंकुश दाभने, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले, उपसरपंच साक्षी विरले, सदस्य नूतन पेरणे, अस्मिता विरले, गीता मोरे, रोशन म्हसकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बाँबे, भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, दहिवली ग्रामपंचायत उपसरपंच नरेश कालेकर, शिवसेना धामोते शाखाप्रमुख जानू पेरणे, उद्योजक दशरथ साबळे आदीमान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कोलीवली राजिप शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर शाळेचे शिक्षक एनडी म्हात्रे यांनी हिराजी पाटील यांचा जीवनप्रवास गीतातून कथन केला. तर आमदार महेंद्र थोरवे यांच्यामुळे आपण कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे करू शकलो. आमदार थोरवे यांनी कायम विकासात्मक दृष्ट्या आपला हात मोकळा सोडला असल्यामुळे ३ वर्षात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीचा चेहरा मोहळ पालटला तर येथील ग्रामस्थांना पाणी, मूलभूत सुविधा आपण पुरवू शकलो याबद्दल कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी आमदार थोरवे व ग्रामस्थांचे आभार मानले. तर तालुक्यातील हुतात्म्यांचा इतिहास हा आगामी पिढीला व्हायला हवा यासाठी आमदार थोरवे यांनी मला स्मारक उभारण्याचे सुचवले होते. त्यानुसार याठिकाणी आपण सहकारी महेश विरले यांच्याशी चर्चा करून याठिकाणी आमदार थोरवे यांना दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन अभंगे यांनी केले.
आमदार थोरवे यांनी व्यक्त केली नाराजी
हुतात्म्यांचे कार्य हे देशासाठी होते न कि एका विशिष्ट समाजासाठी. हुतात्मा भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते तर हुतात्मा हिराजी पाटील हे आगरी समाजाचे होते. आजाद दस्ता स्थापन झाल्यावर त्यात अनेक समाजाचे क्रांतिकारक सहभागी झाले होते. मात्र त्यांनी कधीही समजभेद केला नाही. त्यामुळे याठिकाणी आगरी समाज संघटनेकडून हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला जात आहे. मात्र मी या ठिकाणचा आमदार असून मला निमंत्रण नसल्याचे सांगत आमदार महेंद्र थोरवे यांनी खंत व्यक्त करतानाच मी काम करताना हुतात्म्यांचा आदर्श घेऊन काम करतोय. मी कुण्या एका समाजाचा आमदार नाही तर मी समाजातील सर्व घटकाचा आमदार आहे. असे म्हणत स्पष्टवक्ते समजले जाणारे आमदार थोरवे यांनी आगरी समाज संघटनेच्या नेत्यांचे कान उपटले
शिवसेना ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे यांनी ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांना सामान्य शिवसैनिकांनी आमदार केले. असे टीकास्त्र कोळंबे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर डागले होते. त्यामुळे आज बोलताना माजी पंचायत समिती सभापती अमर मिसळ यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी आजवर कुठलीही निवडणूक लढली नसली तरी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य केले. तर आमदार झाल्यावर वेगाने तालुक्याचा विकास केला. तेव्हा टीका करणार्यांच्या टिकेसह तेही आमदार थोरवे यांच्या विकासकामातच झाकोळले गेले आहेत. असे मिसाळ म्हणाले.