रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायात प्रगत असलेल्या रोहा डायकेम कंपनीत कामाच्या ठिकाणी अचानक सर्पदंश झाल्याने एका ५५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ ऑगस्ट रोजी गुरुवारी घडली. दगडू भोस्तेकर (रा. विठ्ठलवाडी, भुवन, ता. माणगांव) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू भोस्तेकर हे नेहमीप्रमाणे रोहा डायकेम कंपनीच्या परिसरात काम करत असताना त्यांना अचानक सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रोहा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कंपनी व्यवस्थापनाच्या निष्फाळजीपणामुळेच एका निष्पाप कंत्राटी कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप इतर कामगारांकडून तसेच विविध वर्तुळातून केला जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे रोहा औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या सुरक्षिततेसह कंपनी परिसरातील स्वच्छतेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. एमआयडीसी आणि कंपनी परिसरात वाढलेली झाडी-झुडपे, नियमित स्वच्छतेचा अभाव तसेच काही ठिकाणी अपुरा प्रकाश नेहमीच पाहायला मिळत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने सापांसह इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे.
दरम्यान, कंपनी परिसरात सर्पदंशासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक असलेल्या प्राथमिक उपचारांच्या सुविधा, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना उपलब्ध होत्या का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एमआयडीसी प्रशासनाने तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाने औद्योगिक परिसरातील वाढलेली झाडी-झुडपे हटवून नियमित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक प्रकाशयोजना, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि विषारी प्राण्यांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरत आहे.
दगडू भोस्तेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना कंपनी प्रशासनाकडून योग्य आर्थिक मदत व भरपाई मिळावी, अशी मागणी कामगार संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे माणगाव तालुक्यातील भुवन-विठ्ठलवाडी परिसरात शोककळा पसरली असून पोलीस आणि संबंधित प्रशासन या प्रकरणी अधिक पढील ‘तपास युद्ध पातळीवर करत आहेत.