सालोख ग्रामपंचायत नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या दफन स्मशानभूमीवरील जागेवर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
सालोख येथील रहिवाशी असलेले ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीने जेसीबीच्या साह्याने येथील जमिन साफ करून या जागेवरील सागाची झाडे तोडली तर जागेत पुरण्यात आलेल्या मृतांची अवहेलना करून समजाच्या भावना दुखावण्याचा आरोप ग्रामस्थ बुधाजी पदू थोराड यांनी केला. थोराड यांनी याबाबत कर्जत तहसीलदार यांना निवेदन दिले असून या निवेदनात ही जागा आमच्या नावावर आहे,गेली 40 ते 50 वर्षे ही जागा आदिवासी ठाकूर समाजाला दफनभूमीसाठी देण्यात आल्याचे म्हटले आहे.
कर्जत तालुक्यातील सालोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाचीवाडी येथील जागा सर्वे नंबर 72/2 ही जागा 8 एकर असून ही जागा बूधाजी पदू थोराड यांची असून याच जागेला लागून मयत तुलसीबाई पवार यांची सीलिंगची जागा आहे.
सदर ही जागा शासनाने सीलिंग या तत्त्वावर st समाजातील शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी देण्यात आली होती. दरम्यान ही जागा बेकायदेशीर रित्या ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीने मुंबईतील व्यक्तीला विकली असल्याचा आरोप होतोय.दरम्यान ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला यांनी गावातील काही नागरिकांना हाताशी धरून जागा जेसीबीच्या साह्याने साफ केली असून जागा मालक थोराड आणि कांबडी यांच्या जागेतील दफन भूमी देखील उद्ध्वस्त केली आहे.
सदर 72/2 सर्वे नंबर नारळाची वाडी येथील मालकी असणारे ग्रामस्थ कमळी गोविंद कांबडी आणि बुधाजी पदू थोराड यांनी आपल्या जागेतील दफन भूमीवरील जागेवर अतिक्रमण केल्याचे सांगत,गेल्या आठ दिवसांपूर्वी याबाबत आम्ही आमच्या नावाने सालोख ग्रामपंचायत सरपंच,तलाठी,मंडळ अधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना लेखी निवेदन देखील दिले आहे परतू आमची कोणीच दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी कांबडी यांची सून सुनीता कांबडी यांनी केला असून त्यांनी आता समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली आहे.
——————————————
वनविभागाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी आज नारळाचीवाडी या आदिवासी गावात भेट देत जागेवरील विनापरवाना सागाची झाडे तसेच अन्य झाडे तोडल्या प्रकरणी सबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
——————————————
तलाठी महिला अधिकारी ज्योती पाटील,सर्कल अधिकारी अरुण विशे यांनी देखील नारळाचीवाडी या गावाला भेट दिली आहे.ग्रामस्थांची चर्चा केली असून जागे बाबत आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणार असल्याचे सांगितले आहे.
——————————————
आदिवासी समाजाचे अध्यक्ष परशुराम दरोडा आणि भगवान भगत यांनी समाजाची जागा बळकवल्या प्रकरणी तसेच मृतदेहाची अवहेलना केल्या प्रकरणी आम्ही सबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात भेट देवून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.
——————————————
एकूणच कर्जत तालुक्यात जागेला आलेले सोन्याचे भाव यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत असताना आता आदिवासी समाजाला देखील प्रलोभन दाखवून लुटले जात आहेत.त्यातच आदिवासी समाजाची दफनभूमीची जागा देखील येथील मुस्लिम समाजाच्या काही ठराविक लोकांकडून लुटली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर असताना महसूल विभागाचे अधिकारी शांत का म्हणून प्रश्न पुढे येत आहे.