विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आता आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी स्वतंत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहे. मुंबई महापालिकेसह १४ महानगरपालिकांमध्ये विजय मिळवण्यासाठी पक्षाने तयारी सुरू केल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.
“मुंबई ही मराठी माणसाची राजधानी राहावी, यासाठी आम्ही प्राणपणाने निवडणुका लढवणार आहोत,” असे राऊत म्हणाले. महापालिका निवडणुकीत ‘एकला चालो रे’ च्या भूमिकेने शिवसेना महाविकास आघाडीतून फुटून स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊतांवर टीका करत म्हटले की, “राऊतांच्या भूमिकेत नैराश्य दिसत आहे. मात्र, त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे.”
राज्यातील महानगरपालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून, या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या २२ जानेवारीच्या सुनावणीनंतर निर्णय घेईल. प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी किमान तीन महिने लागतील, असे सूत्रांकडून कळते.