सुकेळी ( दिनेश ठमके ) : संपुर्ण रोहा तालुक्यासह सुकेळी, वाकण तसेच आजुबाजुच्या परिसरात अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे वाळाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टीचे व्यवसाय देखिल धोक्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून आभाळात आलेल्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता भरपुर प्रमाणात असतांनाच दोन दिवस पावसाने सुकेळी,वाकण, बाळसई, वांगणी, आमडोशी आदी परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली. या अवकाळी पावसामुळे सध्या जे वाळाचे पिक तयार झालेले होते ते पुर्णपणे खराब होण्याची भीती शेतकरी वर्गांमध्ये झाली आहे. जे काही वाळाच्या पिकाला फुल पकडले होते ते पुर्णतः गळुन पडले आहेत.
त्याचप्रमाणे वीटभट्टी व्यावसायिकांमध्ये देखिल घबराट पसरली असुन कित्येक वीटभट्टयांवर वीट रचलेली आहे. कच्च्या वीटांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पडल्यास त्या वीटांची माती होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तयार झालेल्या वीटांची भट्टी रचण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पंरतु जर का अवकाळी पावसाचे सावट असेच सुरु राहिले तर वीट व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.