कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे परिसरातील परतीच्या पावसाने पीकांना झोडपून काढल्याने भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली असुन मोठया प्रमाणात पाणी साचून राहिल्यास भातशेतीचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार समजला जाणाऱ्या या जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड खांब देवकान्हे परिसरात हस्त नक्षत्र निघाल्यानंतर तसेच ऐन नवरात्र उत्सवात मागील दोन दिवसांपासून तुफान परतीचा पाऊस होत आहे. यामुळे या परिसरातील भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असुन यामुळे या परिसरातील मोत्याची कणस तसेच हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो की काय म्हणून शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. यामुळे शासनाकडून या भातशेतीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून त्याचा मोबदला मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस उत्तम प्रकारे पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता हा अंदाज खरा ठरत सुरुवाती पासूनच पाऊस चांगल्या प्रकारे पडला यामुळे भात पेरणी वेळेवर झाली. तसेच लावणी ही वेळेवर सुरु झाली. परंतु लावणी आर्धी झाल्यानंतर सतत पडलेल्या पावसामुळे या परिसरात पर्ज्यवृष्टी पुरस्थिती निर्माण झाली व लावलेली भातशेती पाण्याखाली गेली व या पुरामुळे काही शेतीची लावणी मागेपुढे झाली होती. जी भातशेतीची लागवड पहिली झाली ती लवकर तयार झाली तर काही मागून लावण्यात आली त्या भात शेतीला थोडा फार पाऊस पाहिजे होता.परंतु परतीचा पडलेल्या जोरदार पावसामुळे तयार झालेली भात शेती व हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्यानेमोठी चिंता बळीराजाला पडली आहे.
संपूर्ण जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे माञ त्यावरच या ना त्या कारणाने आस्मानी संकट शेतकरी राजावर ओढवला जात आहे त्यामुळे त्याच्या धानाला पुरेसा भाव मिळेल का तर कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व सर्व नोकरदार गावाकडे आले. युवा पिढीचा कलह देखील शेतीत ओढवला आहे. शेती करणे हाच मुख्य आधार जाणवू लागला.अनेकांनी शेतीकडे दुर्लक्ष केला होता परंतु असंख्य शेतकरी पुन्हा शेती व्यावसायाकडे वळले. कितीही संकटे आली तरी शेतकरी वर्ग शेती करणे सोडत नाही परंतु अनेक संकटाना तोंड देत यावर्षी भात पिक चांगले आले अशावेळी परतीच्या पावसामुळे दाणेदार कणस मोत्यासारखे धान जमीनदोस्त झाल्याने हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
————————————-
दिवसेंदिवस बळीराजा चिंतेत येत असताना दिसत आहे शेतीसाठी आवश्यक बीबियाणे, रासायनिक खते,नांगरणी, मजुरीचे दर वाढत चालले आहेत परिणाम कोणताही असो तरी ही शेतकरी वर्ग मोठया कष्टानी भातशेतीत भात लागवड तसेच अधिक जोड व्यवसाय करीत असतो.यावेळी भातपिक चांगले येऊन ही परतीच्या पावसाने भातशेती जमीनदोस्त झाल्याने येथील शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. व हातातोंडांशी आलेला घास परतीच्या प्रवासात निसर्गाने हिरावून नेल्याचे चित्र पहावयास मिळत असुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून त्यांना देण्याची घोसणा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप यांनी केली आहे.
