Raigad: पालकमंत्री पदाची बाजी नक्की कोण मारणार, गोगावले की तटकरे? पाहणे ठरणार औत्सुक्याचे

Aditi & Gogavale
पेण :
रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात रायगड जिल्ह्याला मोठा राजकीय मान मिळाला आहे. रायगडमधून शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्याची महायुती सरकारमधील ताकद वाढली असून विकासाच्या नव्या संधी खुल्या झाल्याचे चित्र आहे. मात्र, पालकमंत्री पदावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
पालकमंत्रीपदाचा संघर्ष: गोगावले की तटकरे?
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे उदय सामंत यांच्याकडे होते. मात्र आता, भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्याने आणि आदिती तटकरे यांची पुन्हा कॅबिनेटमध्ये वर्णी लागल्याने, पालकमंत्री पदासाठी संघर्ष नव्याने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोगावले यांची ज्येष्ठता आणि त्यांचे शिवसेनेतील वजन लक्षात घेता ते पालकमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. सुनील तटकरे हे आदिती तटकरे यांना पुन्हा पालकमंत्रीपदी बसवण्यासाठी राजकीय डावपेच खेळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील संघर्षाची पार्श्वभूमी
महाविकास आघाडीच्या काळात आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. मात्र त्यावेळी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी त्यांच्याविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. त्यावेळी सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात वादही रंगला होता. महायुती सरकार आल्यानंतर शिवसेनेचे उदय सामंत यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. परंतु आता मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामुळे पुन्हा राजकीय संघर्षाचे वारे वाहू लागले आहेत.
दोन मंत्रीपदांमुळे रायगडचा विकास खुला?
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिती तटकरे यांना पुन्हा महिला व बालकल्याण मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. दुसरीकडे, भरत गोगावले यांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली असून त्यांना मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. रायगडच्या इतिहासात प्रथमच दोन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल आणि विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेत आहे.
राजकीय हालचालींवर लक्ष
आता सर्वांचे लक्ष जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याकडे लागले आहे. भरत गोगावले यांना ज्येष्ठतेनुसार संधी मिळणार का, की सुनील तटकरे यांचे राजकीय कौशल्य पुन्हा आदिती तटकरे यांना पालकमंत्री बनवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे रायगड जिल्ह्याचे राजकारण अधिक रंगतदार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading