Poladpur: संवाद मेळाव्यात जयंतभाई पाटील यांचा गर्भित इशारा!

Jayantbhai Patil Poldapur
पोलादपूर (शैलेश पालकर) :
शेकापक्ष संपल्याच्या हाकाटया कितीही द्या. शेकापक्षाला राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायचे माहिती आहे. शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या. तसे शेकापक्षाचे दोन शेकापक्ष होणार नाहीत. हे भाजप आणि अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. शेकापक्षाच्या पक्षबदलूंसोबत मतदार जनाधार नसेल. पोलादपूरमधून शेकापक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचे काम या पिढीने केले जे आधीच्या शेकापक्षाच्या नेत्यांना जमले नव्हते म्हणून या संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच मोठया संवाद मेळाव्यामध्ये होईल. यासाठी भाषण राखून ठेवतोय, असा गर्भित इशारा मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात जयंतभाई पाटील यांनी दिला.
याप्रसंगी व्यासपिठावर माजी आ.बाळाराम पाटील, आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, महाराष्ट्र कामगार आघाडीप्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीप्रमुख ऍड.मानसी म्हात्रे, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, राजिमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, सरपंच शरद जाधव, तालुका चिटणीस वैभव चांदे, समीर चिपळूणकर, मधुकर जाधव, मनोहर पार्टे, बापू जाधव तसेच शेकापक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी मोरगिरी गावठाणातील महादेव मंदिरामध्ये मान्यवरांनी दर्शन घेतले. यानंतर स्व. प्रभाकर पाटील सभागृहामध्ये आयोजित संवाद मेळाव्याप्रसंगी बोलताना माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी, भाजपच्या सोशल मिडीयावर डॉ.आंबेडकर ब्राह्मण सांगितले जातात आणि रायगडावरील ज्योतिबा फुले यांनी शोधलेल्या शिवसमाधीचा सोहळा कोणी चालवला आहे हे लक्षात घ्यायचे आहे. जयप्रकाश नारायण यांनी तरूण सुशिक्षितांना राजकारणात येण्याचे आवाहन केल्यानंतर तयार झालेल्या काँग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधली गेली होती. जनसंघाकडून गांधीनगरमधून निवडणूक लढणाऱ्या आडवणींनी भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीचे काम केले तेव्हा सोबतच्या पक्षांची ताकद संपवून तयार झालेल्या या भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा विविध पक्षांची मदत घेतली तेव्हा अन्य पक्षांची ताकद संपविण्याचे काम केले आहे. भाजप हा बहुजन समाजाचा पक्ष नाही शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना तेथे सुरवातीला मोकळा श्वास घेता आला तरी पुढे मात्र गुदमरल्यासारखे होईल, असे संकेत यावेळी दिले.
पोलादपूरमधील उमरठमध्ये स्व.प्रभाकर पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आणले आणि चार दिवसांमध्ये रस्ता तयार केला होता. कुडपण येथे सर्वसाधारण सभा आयोजित करून कुडपणला सर्व अधिकारी वर्गाला चालत नेले. आता दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाचे काय चाललंय, तालुक्यामध्ये काय सुरू आहे, मी आता बोलणार नाही. संवाद मेळाव्याच्या सांगता मेळाव्यात पोलादपूरमध्येच बोलेन, अशी कणखरपणे भूमिका मांडली. शेकापक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला रायगड जिल्हा परिषदेमध्ये अथवा तालुक्यांच्या पंचायत समित्यांमध्ये यश मिळणार नाही, असे भाई जयंत पाटील यांनी सांगितले. देशाच्या राज्याच्या कोकणाच्या आणि जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्याच्या राजकीय विश्लेषणाद्वारे भाई जयंत पाटील यांचे भाषण अभ्यासपूर्ण व प्रभावी ठरले.
याप्रसंगी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी, मध्यंतरीच्या काळामध्ये शेकापक्षाचा कार्यकर्त्यांसोबत संवाद राहिला नव्हता ही खरी बाब असून त्यामुळेच शेकापक्षाचे कार्यकर्ते पोलादपूरच्या नरवीर तानाजी मालुसरेंसारखे होते. कधीही निष्ठा न विकणारे कार्यकर्ते आता इतरांच्या गळाला लागत आहेत, असे खेदाने मान्य करीत लवकरच शेकापक्षाच्या कार्यकारिण्या व पदाधिकारी यांच्यासह सक्रीय कार्यकते व तरूण मतदारांसोबत सुसंवाद साधण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत: भाई जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये मतदार व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याचे ठरविले असल्याचे सांगितले.
यावेळी ऍड. मानसी म्हात्रे यांनी, पोलादपूर तालुक्यातील केवळ 10 महिला तरूणी दिल्यास पोलादपूरच्या प्रत्येक भागातील महिलांना विविध महिलांच्या योजनांचा लाभ तसेच शेकापक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती करून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी तालुका चिटणीस वैभव चांदे यांनी संवाद मेळाव्याच्या प्रास्ताविकामध्ये पोलादपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त करताना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कशा लढवायच्या याबाबत मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. मेळाव्याचे सूत्रसंचालनही चांदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading