पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशिवलीमध्ये सध्या प्रचंड संतापाची लाट उसळली असून, एका त्रिकुटाने महिला ग्रामपंचायत सदस्याचा विनयभंग करत टेंडर प्रक्रिया बळकावल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली असूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित त्रिकुटाला राजकीय आश्रय असल्याचा संशय माजी सदस्य रणजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ग्रामपंचायत वाशिवलीचे सरपंच सखाराम पवार यांनी मागील तीन वर्षांपासून (2022 ते 2024-25) मागासवर्गीय 15% निधी व 15व्या वित्त आयोगातील 26 लाखांचा निधी खर्च केला नव्हता. याविरोधात सदस्य अविनाश मोरे व रोहिणी कडव यांनी गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या. शेवटी जिल्हा परिषदेकडून निधी वापरण्यास मंजुरी मिळाल्यानंतर, 31 कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मात्र, काही कामांना वर्क ऑर्डर न देता आधीच पूर्ण करण्यात आल्याचे आणि दोन वर्षांपूर्वीच पार पडलेल्या कामांसाठी पुन्हा टेंडर काढून बिले उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर 28 मार्च रोजी टेंडर जमा करताना सदस्या रोहिणी कडव यांच्यावर नंदकुमार पाटील, सोपान शेलार, मदन पाटील या त्रिकुटाने अचानक कार्यालयात येऊन धक्काबुक्की केली, महिला सदस्याचा विनयभंग केला, तसेच टेंडर नोंदवलेले रजिस्टर हिसकावून नेले.
या प्रकारामुळे ग्रामस्थांत तीव्र नाराजी असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तसेच संपूर्ण टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला वासंती पवार, कांता वाघमारे, बायजी वाघमारे, हरिश्चंद्र पवार, सखाराम वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.