कोलाड ( श्याम लोखंडे ) :
मुंबई-गोवा राष्ट्रिय महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका आणि बाजारपेठेतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वार घसरून अपघात घडल्याचे समजते मात्र सुदैवाने मात्र त्यांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नसून ते थोडक्यात बचावले असल्याचे बोलले जात असून याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रिय महामार्ग ६६ वरील नावलौकिक असलेल्या कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील प्रभाकर हॉटेल समोर मेन मार्गावरच करण्यात आलेल्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे एकाच दिवसात तीन दुचाकी स्वरांच्या गाड्या स्लिप होऊन अपघात झाला. परंतु सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झाली नाही परंतू ते तीनही चालक किरकोळ जखमी झाले आहेत. या निकृष्ट रस्त्यामुळे तसेच त्यावर खड्डे आणि चिखल मातीतून त्यांचा प्रवास होत असल्याने एखाद्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून केली जात आहे.
मागील पावसाळा संपल्यानंतर पाच महिन्यात आंबेवाडी कोलाड नाका येथील उड्डाण पुलाचे काम सुरु केले नाही.परंतु याच पावसात सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक असतांना आंबेवाडी नाक्यावरील मेन रस्ता बंद करुन उड्डाण पुलाचे काम सुरु करण्यात आले. या अगोदर सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम हे सिमेंट काँक्रेटने पक्के केले गेले नाहीत तर त्यात तो अरुंद आहे. परंतु ते राहिले दूरच हा निकृष्ट दर्जाचा असणाऱ्या रस्त्यावरुन वाहतूक वळविण्यात आल्यामुळे सततच्या वाहतूकीमुळे हा रस्ता खचला तर काही ठिकाणच्या रस्त्याची डांबर निघून गेल्याने रस्त्याचे खडे माती वर आले असल्यामुळे दुचाकी स्वार यांच्या गाड्या स्लिप होत आहेत. मग सतत पाऊस सुरु झाल्यावर या रस्त्याची अवस्था अती गंभिर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दिसुन येत आहे.
मुंबई-गोवा हायवे वरील चौपदरीकरणाच्या कामाला १६ वर्षे पुर्ण झाली असुन या कामात कोणतेही प्रगती नाही. प्रशासनाचा बेजबाबदारपणा व ठेकेदारांचा मनमानी कारभार यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी येथील किराणा मालाचे व्यापारी, हॉटेल, पान टपरी, कापड व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक यांना कोणतेही सवड न देता त्याच्या दुकानावर बुलडोजर फिरावण्यात आला. काही दुकानातील सामान ही काढून दिला नाही.
मुंबई गोवा मेन मार्ग तसेच कोलाड आंबेवाडी नाका चौक हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथून मुंबई गोवा तसेच पुणे,रोहा,मुरुड,अलिबाग कडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते ही वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरु केल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खचला आहे तर काही ठिकाणी रस्त्याची डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याचे खडे वर आल्यामुळे या रस्त्यावरुन टुव्हीलर गाड्या स्लिप होत आहेत.