Breaking News : वरसई च्या सरपंच रेखा पाटील यांची पदावरून हकालपट्टी; पदच्युत करण्याची रायगडमधील पहिलीच घटना

Collector Office Raigad

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 

प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा पाटील यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, ही कारवाई रायगड जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली आहे.
सरपंच रेखा सचिन पाटील यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामसभा न घेतल्यामुळे हिंदू स्वराज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किरण शिगवण यांनी याविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३६ नुसार ही कारवाई केली आहे.
कलम ३६ नुसार, सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी नियमांनुसार कोणत्याही वित्तीय वर्षात ग्रामसभा न घेतल्यास, त्यांना पुरेशा कारणाशिवाय अपात्र ठरवण्यात येते. वरसईच्या सरपंचांनी प्रजासत्ताक दिनी कोणतीही सभा न घेता हा नियम मोडला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे ही कारवाई झाली.
हिंदू स्वराज्य सेनेचे अध्यक्ष किरण शिगवण यांच्या तक्रारीनंतर या घटनेबाबत विस्तार अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी जावळे यांच्याकडे सादर केला होता. अहवालाच्या आधारे, जिल्हाधिकार्‍यांनी सरपंच रेखा पाटील यांना अपात्र ठरवून त्यांना पदच्युत केले आहे. या कारवाईसह वरसई ग्रामसेवकावर देखील निलंबनाची टांगती तलवार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातील प्रकरणांमध्ये ही कारवाई ऐतिहासिक ठरली असून, ग्रामपंचायत प्रशासनामध्ये नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading