नवी दिल्ली :
लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा उपप्रमुख आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते आणि त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. तो लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करीत होता तसेच जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने सांभाळली होती. भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले होते.
टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा
2020 मध्ये पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने मक्कीला टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा झाल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली मर्यादित केल्या होत्या. मक्कीवर दहशतवादी वित्तपुरवठा, कट रचणे, षड्यंत्रात सहभाग, आणि लष्कर-ए-तैयबाच्या पाठिंब्याने दहशतवादी भरती केल्याचे आरोप होते.
लष्कर-ए-तैयबाचे भारतातील हल्ले
-
लाल किल्ल्यावर हल्ला: 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 6 दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले होते.
-
रामपूर हल्ला: 1 जानेवारी 2008 रोजी 5 दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे 7 जवान आणि एका रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले.
-
26/11: मुंबईत लष्कर-ए-तैयबाने सर्वात मोठा दशदवादी हल्ला केला होता. 10 दहशतवादी अरबी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता.
-
श्रीनगर हल्ला: 12-13 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक आत्मघाती हल्लेखोर घुसले. यावेळी एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
-
बारामुल्ला: 30 मे 2018 रोजी बारामुल्लामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.