सत्ता स्थापन करण्याच्या नशेत राजकीय हालचालींना काहीशा प्रमाणात वेग आला असून कोणत्याही परिस्थितीत आपणच सत्तेत विराजमान होऊन नावलौकिक मिळविणार याच स्वप्नात ज्यांना राजकारणाचा काडीचाही गंध नाही अशी मंडळी मुळातच काही वर्षांपूर्वी एकमेकांचे हाडवैरी असलेले राजकीय पक्षांची मंडळी एकत्रित येऊन गुप्त बैठका घेण्यात व्यस्त दिसत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राजकारणाचा गमभन सुध्दा ज्ञात नाही असे सत्तेत सहभागी होऊन गावाचे नेतृत्व करण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांना सुध्दा विश्वासात न घेता परस्पर बैठका घेतल्या जात असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.एखाद्या कार्यक्षम व्यक्तीला सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही त्यामुळे आपल्याला स्वतःची तुमडी भरता येणार नाही.याचसाठी सर्व खटाटोप सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
या छोट्याशा गावावर आपला दरारा असावा, ज्यांना या गावाविषयी काडीचेही सोयरसुतक नाही अशा मूठभर लोकांना हाताशी धरून सत्तेची दिवास्वप्न पाहण्यात हे सत्तापिपासू मग्न दिसत आहेत. स्वतःकडे काहीच कर्तृत्व, वक्तृत्व आणि या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी, इथल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या मार्गी लावता येतील, लोकाभिमुख कामे करता येईल,शासनाचा निधी उपलब्ध करून देता येईल असे नेतृत्व नसताना देखील सत्तेची स्वप्ने बलिशपणाने पाहिली जात आहेत.यांना पाठबळ देणारी काही छुपी मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी,पद ,पैसा आणि प्रतिष्ठेसाठी गावाला अधोगतीकडे नेण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.
सद्यस्थितीत मतदार सुज्ञ असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची पार्श्वभूमी सुध्दा लक्षात घेऊन मतदान केले जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्वतःची दमडी सुध्दा खर्च न करता एखाद्या धनिकांच्या आर्थिक बळावर जे जे इच्छुक उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधुन सज्ज झाले आहेत त्यांना मतदार राजा निश्चितच जागा दाखवून देणार आहे. गावाला अभिप्रेत असणाऱ्या विकास कामांच्या अपरोक्ष जाणारे महाभाग जनतेला माहीत आहेत. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता कार्यक्षम उमेदवारालाच सभागृहात जाण्याची संधी जनता उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
सुज्ञ राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुध्दा गावाचे हित पाहता,युवा वर्गाच्या भविष्याचा विचार करून खोट्या प्रवृत्तीच्या ,ढोंगी व्यक्तींना साथ देऊ नये अन्यथा या गावात एकप्रकारे हुकूमशाहीचे आगमन होऊ शकते,जागोजागी अतिक्रमणे आणि इथल्या नैसर्गिक सौंदर्याचे विद्रुपीकरण होऊ शकते.गावाच्या विरोधात जाऊन कामे करू पाहणाऱ्याचा आगामी निवडणुकीत राजकीय कडेलोट होणे गरजेचे आहे असेही वयोवृद्ध मंडळी मधून बोलले जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.