कोकणी माणूस प्रामाणिक, समाधानी आणि लबाडीपासून दूर असतो, त्यामुळे त्याच्यात सहकाराची खरी ताकद आहे. कोकणचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर तो सहकाराच्या माध्यमातूनच शक्य असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त महाड येथे जनकल्याण सहकारी पतसंस्थेच्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी कोकणातील सहकारी संस्थांना बळकट करण्याचे महत्त्व विशद केले.
प्रवीण दरेकर म्हणाले, “कोकणात सहकाराची चळवळ पुरेशी गती घेत नाही यामागे संस्थाचालकांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे प्रमुख कारण आहे. संस्था नोंदणीपासून ते संस्थेच्या कारभारापर्यंत अनेक पायऱ्यांवर अडथळे आहेत. त्यावर मात करून संस्थांना सक्षम केल्यास कोकणातील सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकतो.”
ते पुढे म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, पाणीपुरवठा संस्था यांमुळे त्या भागाचा विकास झाला, रोजगार निर्माण झाला. कोकणात देखील अशीच शक्यता आहे, परंतु त्या दिशेने पुढाकार घेणारे धाडसी नेतृत्व गरजेचे आहे.”
दरेकर यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा बँकांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांकडे लक्ष वेधून सांगितले की, “कोकणातील जिल्हा बँका मात्र अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मुंबई जिल्हा बँकेच्या अध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकाळात आम्ही अनेक सहकारी प्रकल्पांना आर्थिक सहाय्य केले आहे. कोकण रेल्वे, प्रक्रिया उद्योग, शिक्षण संस्था यांनाही मदतीचा हात दिला आहे.”
ते म्हणाले की, “महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक संस्था लिक्विडेशनमध्ये आहेत. अशा संस्थांसाठी शिबिरांचं आयोजन करून त्यांना नवसंजीवनी देण्याचा विचार आहे. प्रत्येक तालुक्यात एक ‘प्रवीण दरेकर’ तयार झाला, तर कोकणाचा विकास नक्कीच शक्य आहे.”
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.