विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली असून, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने मागणी केली होती, आणि अखेर त्यांना यश आले.
याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतचं अधिकृत पत्र विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे.
महाविकास आघाडीतील संख्याबळ आणि नेतेपदाची निवड
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे 20, काँग्रेसचे 16, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 10 आमदार निवडून आले. कोणत्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने, हे पद रिक्त राहणार का, याची चर्चा सुरू होती.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांच्या नावावर अंतिम निर्णय घेतला. आता त्यांच्या नावाला मंजुरी द्यायची की नाही, हे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अवलंबून आहे.
भास्कर जाधव: अनुभवी राजकारणी
भास्कर जाधव (वय 67) यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. मंत्रिमंडळात त्यांनी नगरविकास, वन, बंदरे, विधीमंडळ कामकाज, क्रीडा, युवक कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
शिवसेनेत परतल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी बंड केले तरीही भास्कर जाधव ठाकरेंच्या गटासोबतच राहिले. ते या निवडणुकीत कोकणातून विजयी झालेले ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.
आता विधानसभाध्यक्ष त्यांच्या नेमणुकीला मंजुरी देतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.