एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यातील विविध डोंगरांमध्ये वणव्यांचं प्रमाण धडकी भरवणारं आहे. वाकण, सुकेळी खिंड, खांब, भिसे खिंड, बाळसई अशा अनेक भागांतील डोंगरमाथे सध्या वणव्यांच्या ज्वाळांनी कुरतडले गेले असून, ही नैसर्गिक संकटं वनविभागाच्या निष्काळजी धोरणामुळे आणखी भयावह होत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या वणव्यांमुळे केवळ झाडांची, सुकलेल्या पाचोळ्यांची नव्हे तर अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यप्राण्यांचीदेखील राख होण्याची वेळ आली आहे. या परिसरात झाडांची राखरांगोळी पाहायला मिळते, परंतु वनअधिकारी मात्र घटनास्थळी फारसा वावर करताना दिसत नाहीत.
फॉरेस्ट विभाग कुठे आहे?
मार्चपासून उष्णतेच्या झळा वाढत असताना सुकलेला पाचोळा व झाडांची गळती यामुळे डोंगरमाथे वणव्यांसाठी तयार होत होते. मात्र, याकडे वेळीच लक्ष न देता वनविभागाने हतबलतेची भूमिका घेतली की काय, असा संशय स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक ठिकाणी आग पसरताना दिसली, पण ती विझवण्यासाठी ना उपाययोजना ना यंत्रणा सक्रिय झाल्याचं चित्र आहे.
प्रशासनाला जाग येणार कधी?
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वणव्यांचं वास्तव पाहता, वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी तत्काळ परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी आता उघडपणे होत आहे. अन्यथा या वणव्यात केवळ जंगल नाही, तर प्रशासनाची जबाबदारीही जळून खाक होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.