लाडक्या बहिणीमुळे शॉर्टेज असले तरी उमरठच्या समाधी सुशोभीकरणासाठी 10 कोटी आणणार: ना. भरत गोगावले यांची ग्वाही

Bharat Gogavale In Umarath
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
2022च्या शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळयात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून 5 कोटी मंजूर केल्यानंतर 10 कोटी देण्याची घोषणा केली होती. आपण स्वत: लाडक्या बहिणीमुळे राज्याकडे पैशाचे शॉर्टेज असले तरी मुख्यमंत्री महोदयांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे फलोत्पादन, रोहयो व खारलँड मंत्री ना. भरत गोगावले यांनी दिली.
 रायगड जिल्हा परिषद, पोलादपूर पंचायत समिती आणि नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट,उमरठच्या संयुक्त विद्यमाने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 355 व्या शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून ना. गोगावले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी दिप्ती घाट, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, भाजप अध्यक्ष तुकाराम केसरकर, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नरवीरांचे 13वे वंशज रायबा मालुसरे, राजिप उपअभियंता नरेंद देशमुख, पोलादपूर गटशिक्षणाधिकारी संजय वसावे, माजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनावणे, राजिपचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच पोलादपूरच्या नगरसेविका अस्मिता पवार, शिल्पा दरेकर व स्नेहल मेहता आदी उपस्थित होते. प्रारंभी ना.भरत गोगावले यांचा उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्याहस्ते तर शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांचा ना.भरत गोगावले यांच्याहस्ते नरवीर तानाजी मालुसरे 2025 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ना. गोगावले यांनी, कोणी पंढरपूरला जातो, कोणी शिर्डीला जातो, तुळजापूर, आळंदी, तिरूपतीला जातो तसेच प्रत्येकाने एकदा तरी रायगडावर आले पाहिजे, असे सांगून नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी, राजमाता जिजाऊ पुण्यतिथी पाचाड तसेच रायगडवर तिथीनुसार शिवछत्रपतींची जयंती आणि हनुमान जयंतीला शिवछत्रपतींची पुण्यतिथी आणि शिवराज्याभिषेक त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक या उत्सवाला आम्ही आवर्जून उपस्थित राहता, असे सांगून हल्ली मंत्री पद मिळाले तर खुशीत आणि नाही मिळाले तर मुशीतून जाणारे पाहतो, पण त्याकाळी शिवाजी महाराजांसोबत नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू, जिवा महाला असे जिवाची बाजी देणारे साथीदार होत, असे सांगितले.
यावेळी उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पुर्वी जिल्हा परिषदेमध्ये या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 355 व्या शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळयाप्रसंगी 50 हजाराचे खर्चाचे बजेट होते. सध्या 4 लाख रूपये आहे. मात्र, या भागात पर्यटकांचा वाढता वावर पाहता येथील सोयी सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज असल्याने फळझाड लागवड तसेच सुशोभिकरणासाठी नामदार गोगावले यांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राथमिक शाळा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी दिवसभर शौर्यदिनाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading