मौजे बामणोली गावातील वाढत्या नदी पात्राचा गावातील घरांना धोका

bamnoli
मुंबई ( शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळलच असलेल्या संगमेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या सह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या मौजे बामणोली(ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी )येथील नदीपात्र दि.२१/०७/२०२१ ते २३/०७/२०२१ या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रात दगडाचा भराव झाल्यामुळे नदीपात्र बदलले आहे. त्यामुळे तेव्हा पासून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह नदी शेजारील रत्नागिरी -कोल्हापूर मार्गांला जोडणाऱ्या देवरुख -कळकदारा रस्त्यावरून दरवर्षी वाहत असल्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहमुळे ढासळत आहे. तसेच आजू -बाजूच्या भात पीक शेतात पाणी घुसून शेत जमिनी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहेत. शिवाय नदी शेजारी असलेल्या काही घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
कारण २०२१ मध्ये झालेल्या तीन -चार दिवस सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरले होते. त्याची भीती आजही आहे असे बळीराज सेना उपनेते आणि मुंबई उपाध्यक्ष कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले यांनी बोलताना सांगितले.आताच चार दिवसापूर्वी (२४/७/२०२३ ते २७/७/२०२३)झालेल्या मुसळधार पावसामुळेही धोका निर्माण झाला होता.त्यामुळे येथील रहिवाशी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन दिवस -रात्र काढत आहेत. गावातील बौद्धवाडी ग्रामस्थ यांची पाण्याची विहीर नदीपात्रपासून काही फूट अंतरावर असल्यामुळे भविष्यात ती विहीर जमीनदोस्त होऊ शकते. तसे झाले तर या वाडीची पाण्याची मोठी गैरसोय होणार आहे.
शिवाय घरे, रस्ता, शेत जमीन, लागवड केलेली भात शेती वाहून गेली तर करोडो रुपयेचे नुकसान होणार आहे.आपत्ती झाल्यावर नुकसान भरपाई देत बसण्यापेक्षा त्याअगोदर उपाय योजना करून होणारा संभाव्य धोका दूर करण्यासाठी आवश्यकता असलेल्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारून स्थानिक रहिवाशी यांना भयमुक्त करावे अशी मागणी बळीराज सेना उपनेते आणि मुंबई उपाध्यक्ष कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading