मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या मालकीच्या मेसर्स आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा अधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या पॅचवर्कमध्ये डांबर न वापरताच कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. विशेष म्हणजे, ही कंपनी मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या नावे असून, २०२३ मध्ये घडलेल्या या घोटाळ्याच्या वेळी त्यांचे आई-वडील आणि भाऊ आमदार किरण सामंत कंपनीच्या संचालक मंडळावर होते.
मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेत राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणी ९ एप्रिलला होणार आहे.
याचिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा अधिकाऱ्यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एल. पी. जाधव (कार्यकारी अभियंता), आर. पी. कुलकर्णी (उपअभियंता), रविकुमार बैरवा (लेखापाल), के. एस. रहाटे (शाखा अभियंता), स्नेहा मोरे (ऑडिटर) आणि जे. एच. धोत्रेकर (उपअभियंता) यांनी या घोटाळ्यात भूमिका बजावल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याचिकाकर्ते रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी याप्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती नेमावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, संबंधित कंत्राटाचे संपूर्ण तपशील सादर करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणावर राज्य सरकारकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि न्यायालयाचा पुढील निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.