माथेरान (मुकुंद रांजाणे) :
स्वातंत्र्य काळात सुध्दा पारतंत्र्यात असल्याचा अविर्भाव जाणवत असल्याने राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे माथेरान मध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना प्रत्येक हक्कासाठी आजवर संघर्ष करावा लागतो आहे ही पुरोगामी महाराष्ट्रात खेदाची बाब असल्याचे जेष्ठ नागरिक बोलत आहेत. जिल्ह्यातील एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी सुविधांचा अभाव आणि जीवनाश्यक बाबीसाठी सुध्दा संघर्ष करावाच लागत आहे. या गावाला सक्षम पालकत्व लाभलेले नाही अन कुणीही वाली उरलेला नाही त्यामुळेच इथला स्थानिक मेटाकुटीला आला आहे.
पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सातत्याने बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याचा पुरवठा वेळेवर आणि नियमित होत नाही.याचाच इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे.वारंवार बत्ती गुल होत असते त्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. आईस्क्रीम तसेच दूध वगैरे नाशिवंत वस्तू विजे अभावी खराब झाल्यामुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
वीज बिल वेळेत भरला नाही तर वीज कनेक्शन कट करण्यासाठी अधिकारी वर्ग पुढाकार घेत असतात. जवळपास शंभर टक्के वसुली होत असताना देखील विजेच्या समस्या सद्यस्थितीत बाराही महिने सुरूच आहेत.शेवटचा पर्यटन हंगाम असताना इथे नेहमीच उद्भवणाऱ्या समस्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे आता यापुढे राजकारण विरहित कामे करत असणाऱ्या माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती शिवाय या गावाचे काही सार्थक होणार नाही.राजकीय अनास्थेमुळे हे गाव आजही समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.
—————————— —————–