महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा: मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन व पुरस्कार वितरण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा: मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन व पुरस्कार वितरण
अलिबाग :
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान, रायगड येथे आयोजित भव्य समारंभात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून वंदन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाद्वारे महाराष्ट्र राज्यगीत धून वादनाने झाली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, गुन्हे शाखेचे श्वान पथक, डायल-112 व 108 आपत्कालीन सेवा वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दल आदींचा सहभाग होता.
राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे – आदिती तटकरे
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने होत आहे.
“त्रिसूत्री कार्यक्रम” राबवून शासन सुशासनाचा ध्येय साध्य करत आहे. मागील 100 दिवसांत जिल्ह्यातील विविध विभागांनी लोकाभिमुख कामगिरी बजावून प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्यापर्यंत होत असून पायाभूत सुविधा उभारणीला गती मिळाली आहे. नवी मुंबईत 250 एकरावर “नाविन्यता नगर – इनोव्हेशन सिटी” साकारण्यात येणार आहे. बंदर विकासासाठी “महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023” लागू करण्यात आले आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा दरम्यान अत्याधुनिक बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून विकसित होत असून जून 2025 पर्यंत ते कार्यान्वित होणार आहे.
महत्वपूर्ण योजना व आरोग्य मोहिमा
महिलांच्या सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना, अंगणवाडी सेविकांच्या 18 हजार रिक्त पदांची भरती, तसेच आरोग्य क्षेत्रात सात प्रमुख मोहिमा राबवण्यात येत आहेत. क्षयरोग शोध मोहीम, अवयव दान जनजागृती, स्वच्छ मौखिक आरोग्य इत्यादी उपक्रम प्रभावीपणे सुरू आहेत.
कृषी क्षेत्रात “अ‍ॅग्रीस्टॅक” योजना सुरू करण्यात आली असून, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला गेला आहे. किनारपट्टीवरील मत्स्य व्यावसायिकांना विमा आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे.
सेवा व कर्तृत्वाचा गौरव
यावेळी पोलीस दलातील 15 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्हांनी गौरविण्यात आले. तसेच अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा आणि “स्टुडंट पोलीस कॅडेट” (SPC) कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रोहा येथील चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालयाचा गौरव करण्यात आला.
एकत्रित कामगिरीने प्रगतीशील महाराष्ट्राचे स्वप्न साकारूया – आदिती तटकरे
समारोपाच्या भाषणात मंत्री तटकरे म्हणाल्या, “सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आपण सर्वांनी मिळून प्रगतीशील, पुरोगामी व सर्वसमावेशक महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading