महाड रायगड रस्ता शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी पूर्ववत करा अन्यथा…

Mahad Raigad Road
महाड ( मिलिंद माने ) :
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीने मागील एक महिन्यापासून बंद ठेवल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे तर जागोजागी अर्धवट अवस्थेत कामामुळे मोठ्या प्रमाणावर शिवभक्तांना तसेच पर्यटकांना व स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यातच 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा सहा जून वर येऊन ठेपला आहे या सोहळ्यापूर्वी या रस्त्याची कामे पूर्ण न झाल्यास महाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन करण्याचा इशारा महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा पानापुरे यांना लेखी निवेदन देऊन दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड कडे जाणारा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून मागील चार वर्षापासून चालू आहे मात्र या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने व रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा नाहक त्रास. व रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा शिडकावा केला जात नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्य देखील बिघडले आहे याकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग मात्र जाणीव पूर्व दुर्लक्ष करत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे
सहा जून रोजी 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या वेळेला किल्ले रायगड वर येणारे शिवभक्त व पर्यटक व स्थानिक जिल्हा सहित तालुक्यातील नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी किल्ले रायगडावर होत असते मात्र या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे त्यातच एक महिन्यापासून सदरच्या रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना व पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या महाड येथील अधिकारी झोपी गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून सहा जून पूर्वी या रस्त्याची कामे पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाड तालुका संपर्कप्रमुख रघुवीर देशमुख यांनी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना दिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे.
महाड तालुक्यामध्ये सध्या विविध गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत यामध्ये महाड रायगड रस्ता, म्हाप्रळ- महाड- भोर- पंढरपूर, मुंबई गोवा महामार्ग. क्रमांक 66 त्याचप्रमाणे अनेक गावात खेडोपाडी रस्ते आणि मोऱ्यांची कामे सुरू आहेत.
महाड रायगड रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत चार वर्षाहून अधिक काळ सुरूच आहे. अनियोजित कामामुळे ही कामे रखडलेली आहेत. ठेकेदार काम पूर्ण करण्याच्या घाईमध्ये किती दिवसात किती काम पूर्ण होईल याकडे न पाहता संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करून टाकत आहे. खोदलेल्या रस्ता तसाच ठेवून अन्य ठिकाणी कामे केली जात असल्याने ज्या ठिकाणी खोदकाम आणि भराव केला जात आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य तयार होत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे टाकलेल्या मातीचा भुगा होऊन ही माती हवे बरोबर नागरिकांच्या घरांमध्ये आणि तोंडावाटे शरीरात शिरकाव करत आहे. यामुळे शेकडो नागरिक श्वसनाच्या विकाराने त्रस्त झाले आहेत.
महाड तालुक्यात सुरू असलेल्या महाड रायगड मार्गावरील कोंझर ते किल्ले रायगड, राजमाता जिजाऊ माँसाहेब समाधी आणि पाचाड, नाते खिंड ते तेटघर या दरम्यान रस्त्यासाठी खोदकाम करून भराव करण्यात आला आहे. या मार्गावर ठेकेदार पाणी शिंपडत नसल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होतात त्यामुळे पुढील रस्ता वाहन चालकांना काही वेळ न कळल्यामुळे वारंवार अपघात या मार्गावर होतात नागरिकांच्या आरोग्याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करून आहेत. या धुळीमुळे रस्त्या शेजारी असलेल्या घरांमधील नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. रस्त्यावर पाणी मारा असे सांगून देखील ठेकेदार देखील लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या धुळीमुळे रस्त्याकडेला असलेले छोटे लघु व्यावसायिक खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेल चालक देखील त्रस्त झाले आहेत.
महाड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंता व कार्यकारी अभियंता हे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने नागरिकांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्याचे दखल घेण्याचे सौजन्य महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता दाखवत नाहीत तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही ठेकेदाराला नोटीस देखील पाठवणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी घेत असल्याने व तालुक्यातील राज्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठेकेदाराकडून काम मिळत असल्याने ते देखील नागरिकांच्या तक्रारीकडे जाण्यापूर्वी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आता महाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना इशारा दिल्याने आता किती दिवसात या रस्त्याचे काम मार्गी लागते याकडे रायगड वासियांचे डोळे लागून राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading