भारत-पाक संघर्ष उफाळला; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नौदल सतर्क, मच्छिमारांनाही Shoot-at-Sight इशारा

Boat
मुंबई (मिलिंद माने) : 
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्ताननेही प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने अत्यंत ताकदीनं सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानचे ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीम भारताने निष्प्रभ केली.
सध्या पाकिस्तानकडून सागरी मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 26/11 च्या धर्तीवर पुन्हा एकदा समुद्रमार्ग वापरण्याचा डाव आखला जात असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सूचित केलं आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने मुंबईतील मच्छिमारांसोबत तातडीची बैठक घेतली. मच्छिमारीसाठी ठराविक भागांमध्येच परवानगी देण्यात आली असून, नौदलाने ज्या क्षेत्रात ‘नो-फिशिंग’ झोन घोषित केला आहे, तिथे घुसखोरी झाल्यास **‘शूट टू किल’**च्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यांनजीक जाऊ नये, अशा सूचना देत सुरक्षेच्या दृष्टीनं सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून त्यांचा डेटा एका खास अॅपवर संकलित करण्यात येणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने गुजराती मच्छिमारांच्या काही बोटी ताब्यात घेतल्या असून, त्या बोटींचा वापर घुसखोरीसाठी होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने नौदलाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फक्त मुंबईच नव्हे, तर कोकण किनारपट्टीवर आणि इतर राज्यांतील महत्त्वाच्या समुद्रकिनाऱ्यांवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता, संरक्षण दलाने हालचाली वाढवल्या असून नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिस किंवा सुरक्षादलांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading