
नागोठणे ( महेंद्र माने ) :
इंद्रप्रस्थ हॉटेलच्या सभागृहात शुक्रवार 20 सप्टेंबर रोजी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खा.धैर्यशील पाटील,संस्थेचे संस्थापक जयराम पवार,सहा.पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी, शासकिय ऑडिटर दिनेश कोळी, कायदेशिर सल्लागार अॅड. धनंजय धारप तसेच कोकण मर्कंटाईल बँक मॅनेजर अशोक हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संस्थेच्या 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पतसंस्था ही पैसे विश्वासणे ठेवण्याचे ठिकाण असल्याचे प्रतिपादन खा. धैर्यशील पाटील यांनी केले.
या सभेत शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात नाविण्यपूर्ण काम करणा-या नामवंत व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खा.धैर्यशील पाटील यांनी हा कार्यक्रम कौटुंबिक वातावरणात साजरा होत असल्याचा आनंद असून पतसंस्थाही आपल्या जवळचे पैसे विश्वासाने ठेवण्याचे ठिकाण असून देवाण घेवाण करण्या मधला दुवा आहे.समोरच्याचे पैसे घ्यावेत व ते योग्य माणसाला द्यावेत व त्याची व्याजासह वसूली करणे सोपे नसले तरी ते काम संस्थेचे अध्यक्ष व संचालक व्यवस्थित करीत असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करीत आहे.
पतसंस्था तुमचे कुटुंब आहे हे स्वरूप जोपर्यंत तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून ठेवाल तोपर्यंत तुमच्या आमच्या व्यक्तीगत आयुष्याला आर्थिक हातभार निश्चितपणे लागणार असून यामध्ये राजकारण आले तर तुमचे पैसे अडचणीत येऊ शकतात असे सांगून या संस्थेने गोरगरीब जनतेच्या संसाराला हातभार लावण्याची घेतलेली जबाबदारी यापुढेही अशीच चालू राहो असे शेवटी खा. धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
चांगले संचालक व पारदर्शकतेमुळे संस्था प्रगती पथावर ; कार्यक्षेत्र तालुक्यात पसरणार – विलास चौलकर
विलास चौलकर यांनी पतसंस्था टिकविणे महत्वाचे असून चांगले संचालक,कठोर परीश्रम व पारदर्शक कामामुळे ही संस्था प्रगति पथावर असल्याने गेली चार वर्षे संस्थेला अ वर्ग मिळत आहे. आज सर्वांच्या साथीने पतसंस्थेला 26 वर्षे पूर्ण झाली आहेत.ही संस्था नागोठणे शहर मर्यादित न ठेवता ते कार्यक्षेत्र संपूर्ण तालुक्यात पसरविणार असल्याचा विश्वास चौलकर यांनी व्यक्त करून सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल साधारण 27 कोटी पर्यंत गेली असून गरजवंताला मासिक सभेतच कर्ज मंजूर करून देण्यात येत असतो. सदरील कर्जाची पाच लाखाची मर्यादा दहा लाखांची करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच संस्थेत कोणताही पक्षपणा न करता सभासद संख्या वाढविणार असल्याचे सांगून सर्व सभासदांना 09 % लाभांश शेवटी विलास चौलकर यांनी जाहीर केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना रोहिदास हातनोलकर यांनी केले असून या कार्यक्रमाला सदानंद गायकर,चंद्रकांत गायकवाड,किशोर म्हात्रे, निलोफर पानसरे,श्रेया कुंटे,पूनम काळे,सचिन मोदी,बाळासाहेब टके,मिलिंद धाटावकर,सुनील कुथे,विवेक सुभेकर, रविंद्र वाजे,श्वेता चौलकर,सुजाता जवके,प्रतिभा तेरडे यांच्यासह संस्थेचे शरद वाडेकर, महादेवसिंग परदेशी, प्रफुल नागोठणेकर, सखाराम घासे,दिनेश घाग,रतन हेंडे, वैशाली जोगत यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक,सभासद,कर्मचारी व विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.