पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 121 व्या भागामध्ये देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली.
“या हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाच्या अंगात संताप उसळतो आहे. शांततेकडे वाटचाल करणाऱ्या काश्मीरला पुन्हा अशांत करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “दहशतवाद्यांचे हे कृत्य त्यांच्या दुबळेपणाचं प्रतीक आहे. काश्मीरमध्ये जेव्हा पर्यटन वाढू लागले, रोजगार निर्माण होऊ लागले, तेव्हा हे दहशतवाद्यांना सहन झालं नाही.”
मोदी पुढे म्हणाले, “भारताची एकता हीच आपल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मोठी ताकद आहे. देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून या हल्ल्याचा निषेध होत आहे. अनेक जागतिक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत पाठिंबा दर्शवला आहे. मी पीडित कुटुंबियांना विश्वास देतो की हा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल.”
हल्ल्याचे गांभीर्य अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, “देशातील विविध राज्यांतील नागरिक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोकही या वेदनेत सहभागी आहेत. हेच आपल्यातील एकतेचं बळ आहे.“
मोदींच्या या भाषणात दहशतवादाविरुद्धच्या लढ्याचे नवे रूप आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिसून आला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.