सबंध महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तांबडी प्रकरणात माणगाव सत्र न्यायालयाने गुरुवारी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. जुलै २०२० मध्ये पीडितेवर अत्याचार करून खून केल्याच्या खळबळजनक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, आता न्यायालयीन निकालात सर्व आरोपी दोषमुक्त ठरले असून, या निर्णयावर समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या निकालामुळे तपास यंत्रणा, सरकारी वकील उज्वल निकम आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “घटना घडलीच नाही का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. समाजातील विविध घटकांनी शनिवारी रोहा येथे पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवला.
मराठा समाज, बहुजन समाज, तसेच स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोहा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे समीर शेडगे, भाजपचे अमित घाग, आप्पा देशमुख, उदय शेलार, रमेश वायकर, ॲड दीपक सरफळे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“आरोपी नाहीत मग खरे आरोपी कोण?” असा संतप्त प्रश्न विचारण्यात आला. तपास, कोर्टातील मांडणी, सरकारी यंत्रणा आणि वकिलांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. निकालाचा दिवसही कळवला गेला नाही, अशी टीका करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी हा निकाल पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगत, “पीडितेला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला.
——————————————–
तांबडी अत्याचार व हत्या प्रकरणी लागलेला निकाल हा अत्यंत अन्यायकारक आणि दुर्दैवी आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, उच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
——————————————–
या निकालाबाबत ॲड उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली. तपासातील त्रुटी लक्षात घेत सखोल चौकशीचे सबंधीतांना निर्देश देण्यात आलेत, पिढीतेच्या न्यायासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खा सुनिल तटकरेंनी दिल्याने पुढे काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.