
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑॅथॉरिटीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत सामाजिक संस्था सस्टेनेबल ऍक्शन टुवर्ड ह्युमन एम्पॉवरमेंट (साथी) यांचे मार्फत जेएनपीए-सक्षम प्रकल्प राबवित आहे; ज्यामध्ये महिला शेतकऱ्यांना त्यांची अंगीभूत कौशल्ये आणि क्षमता सुधारण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. म्हसळा तालुक्यातील काळसूरी आणि साळविंडे येथे कृषी-आधारित उत्पादनांची प्रक्रिया, क्लस्टर निर्मिती आणि विपणन व्यवस्था यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे.
साथी सामाजिक संस्थेचे संचालक सौरभ कुमार यांनी यावेळी, महाराष्ट्रातील गरीब स्त्रिया फळे, कडधान्ये आणि तृणधान्ये यांसारखी कृषी आधारित उत्पादने गोळा करून आपला उदरनिर्वाह करतात. तंत्रज्ञानाचे अपुरे ज्ञान, शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध नसणे, मार्केटिंग यंत्रणा अपुरी, अकार्यक्षम असणे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचे अधिकाधिक शोषक करण्याकडे कल असतो, या स्वरूपामुळे गरीब महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती देताना जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि साथी या सामाजिक संस्थेने हे काम सुरू केले असून त्याअंतर्गत 200 बहुजन म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व समाजातील महिला शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असून याद्वारे गरीब महिलांच्या क्षमता वाढविण्यात येऊन त्या सक्षम होऊ शकतील. शाश्वत आणि स्वावलंबी पध्दतीने बाजार आणि जागतिक स्पर्धेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम परियोजना अत्यंत महत्वपूर्ण आहे, असेही यावेळी सांगितले.
साथी सामाजिक संस्थेचे संचालक सौरभ कुमार यांनी सांगितले की, आमची संस्था गरीब महिलांना विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत स्वयं-सहायता गटांमध्ये संघटित करून आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्याचे काम करत आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन आम्ही महिलांना स्वावलंबी बनवू शकू याचा आम्हाला आनंद आहे, अशी भूमिका आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केली.