कोकणातील शेतकऱ्यांची जमीन दूर्गम, तीव्र उताराची आणि कमी आकाराच्या बांधाबांधांची असल्याने या शेतजमिनीला जलसिंचनासाठी मोठी शेततळी घेणे शक्य होत नसल्याने पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे सर्वात आधी छोटया आकाराचे शेततळे बांधण्यात आले. या शेततळयाला महाराष्ट्र शासनाकडे जलकुंड नावाने प्रस्ताव करण्याइतपत एकाच गावात 22 जलकुंडांचे काम केले. शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी राज्यसरकारच्या कृषी आयुक्तालयाने परिपत्रक काढून ‘जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न’ कोकणातील पाचही जिल्ह्यांसाठी राबविण्यास मान्यता दिली आहे. कृषी विभागाचे कर्मचारी, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन त्याचे शासनाच्या जीआरमध्ये रूपांतर घडविण्याचा हार जलकुंडाचा पॅटर्न गोळेगणी गावाच्या नावाने ओळखला जाणार आहे.
2019 मध्ये पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी या टंचाईग्रस्त गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनी आंबा व काजू या फळपिकांची लागवड केली. लागवड केलेल्या कलमांना डिसेंबर ते मे या कालावधीत संरक्षित पाणी देण्याकरीता कृषी सहाय्यक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव येरुणकर यांच्या शेतामध्ये 5 मी लांब 5 मी रूंद आणि 2 मी.खोल अशा आकारमानाचे 1:0.50 उताराच्या जलकुंडाचे खोदकाम केले व त्याला 500 मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करुन 52 हजार 731 लीटर संरक्षित पाणीसाठा करण्यात आला. जलकुंडात उपलब्ध झालेले पाणी लागवड केलेल्या कलमांना संरक्षित पाणी म्हणून वापर केल्याने कलमे जगण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
यानंतर टंचाईग्रस्त गोळेगणी या गावामध्ये विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी महाड बालाजी ताटे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पोलादपूर सुरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक देवपुर मनोज जाधव यांच्या तांत्रिक मार्गदर्शन व जनजागृतीमुळे गोळेगणी गावांतील 1) नामदेव येरुणकर, 2)गणपत पवार, 3) शेखर येरुणकर, 4) अविनाश येरुणकर,5) प्रकाश येरुणकर, 6) दीपक मोरे, 7) ज्ञानेश्वर मोरे, 8) राजेंद्र दळवी, 9) अनिकेत मोरे, 10) सागर मोरे, 11) विमल मोरे, 12) मंदा सुर्वे, 13)मधुकर मोरे, 14)बाळकृष्ण मोरे,15) दशरथ मोरे,16)दीपक मोरे,17) नितीन मोरे, 18)दिपक कदम,19) रामदास मोरे, तुटवली 20)गणेश मोरे, 21)राजाराम शिंदे, मोरगिरी 22) दगडू ढेबे, मोरगिरी असे शेतकऱ्यांच्या स्वयंप्रेरणेने 22 जलकुंडांचे काम पुर्ण करण्यात आले. या जलकुंडांच्या कामाला ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी सातत्याने तसेच वेळोवेळी प्रसिध्दी देऊन शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. याकामी देवेंद्र दरेकर तसेच प्रकाश कदम या पत्रकारांनीही प्रसिध्दी दिली.
कोकणातील जमिनधारणा क्षेत्र सरासरी 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. कोकण विभागात सरासरी पर्जन्यमान 3500 ते 4000 मि.मी. असुन कोकण विभागातील हवामान आंबा, काजू व इतर फळपिकास पोषक आहे. कोकण विभागात दरवर्षी विविध शासकीय योजना, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक शेतकरी यांच्याकडून आंबा व काजू या फळपिकांची लागवड मोठया प्रमाणात करण्यात येत असुन फळबागा जीवंत राहण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे कोकणातील जमिनी डोंगर उताराच्या व कातळ भाग असल्यामुळे लागवडीनंतर सुरवातीच्या 3 वर्षाच्या कलमे रोपांना डिसेंबर ते मे या महिन्यांच्या कालावधीत संरक्षित पाणी देण्याची सुविधा पुरेशा नसल्याचे दिसून येते.
शेततळयाचे आकारमान तसेच त्याकरीता येणारा खर्च या बाबींचा विचार करता कोकणातील दुर्गम व डोंगराळ,कातळ भागात शेततळे खोदणे शक्य नाही अशा जागेवर हा जलकुंड उपचार फायदेशीर असून 5 मी लांब 5 मी रूंद आणि 2 मी.खोल आकारमानाचे जलकुंड कोकणातील सर्वसामान्य फळबाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी कोकणातील फलोत्पादन पिकासाठी जलकुंड या उपचारास तांत्रिक शिफारस केलेली असुन या अनुषंगाने मा. संचालक, मृद व जलसंधारण यांच्याकडून शासनास सादर केलेल्या जलकुंड प्रस्तावास मृद व जलसंधारण विभागाच्या दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कोकण विभागासाठी डोंगराळ भाग कातळामध्ये यंत्राद्वारे जलकुंडाचे काम करण्याचे मापदंड मंजुर केलेले आहेत.
याबाबतचे अधिकृत परिपत्रक दि.3 जानेवारी 2025 रोजी राज्यसरकारच्या कृषी आयुक्तालयाने जारी केले असल्याने कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये जलकुंड निर्मितीस राज्यसरकारचे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ, मनरेगा असे पर्याय उपलब्ध असून जलकुंड निर्मितीसाठी गोळेगणी गांव ज्यांच्या विधानसभा मतदार संघामध्ये आहे; त्या रोजगार हमी योजना मंत्री ना.भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांना रोहयोतून जलकुंड निर्मितीसाठी भरघोस प्रोत्साहन दिल्यास शेतकऱ्यांचे कल्याण साधले जाणार आहे.
सर्वांचा गौरव करून जल्लोष-प्रकाश दळवी
लवकरच जलकुंड निर्मितीसाठी सहभाग घेणाऱ्या व ‘जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न’ तयार करणाऱ्या शेतकरी, कृषीविभागाचे अधिकारी, पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचा सर्वांचा गौरव करून गोळेगणीचे ग्रामस्थ जल्लोष करणार असल्याची माहिती समाजसेवक व सरपंच प्रकाश दळवी यांनी दिली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.