अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठ्या आदराचे घर प्रस्थापित केले आहे. कोणीही व कुठलाही व्यक्ती आपल्या अडीअडचणी, समस्या घेऊन आपल्या दारात आलेल्या गरजवंताला रिकाम्या हाताने हताश न करता परत पाठवणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड म्हणून लहानांपासून ते सर्व स्तरातील महिला व पुरुष यामध्ये सर्वानाच परिचित झाला आहे.
बारावी पर्यंत शिक्षण झाले तेव्हा पिंट्या गायकवाड याच्या घरात एक मोठा भाऊ व एक मोठी बहीण आणी आई बाबा असा त्यांचा परिवार होता. त्याकाळी पिंट्याचे वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांनी आपल्या घरच्या बेताच्या परिस्थितीत गावोगावी जाऊन आईस्क्रीम(कुल्फी) कांडी विकत आपल्या दोन मुलांना व एका मुलीला आपल्या ऐपतीनुसार परीने शिक्षण दिले.
यावेळी पिंट्या यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांना आपल्या घरातील प्रपंच चालविण्यास आर्थिक मदत होईल याउद्देशाने किहीम समुद्रकिनारी पर्यटकांना चिंचा, बोरे, कैऱ्या विकून हातभार लावला तर काही दिवस मुशेत येथील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे किशोर सातमकर व रत्नकांत भगत यांच्याकडे मोलमजुरी केली, तद्नंतर बाबांच्या सोबत चोंढी नाक्यावर भाजीपाला विकूनही हातभार लावला.
याचदरम्यान आपल्या बाबांचे मित्र काँग्रेस पक्षाचे अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार स्व. मधूशेठ ठाकूर यांच्यासोबत त्यांच्याच तालमीत राहून सामाजिक व राजकीय धडे गिरवित त्यांच्याकडून ८०% समाजकारण तर २०% राजकारणाचे अप्रतिम असे ज्ञान प्राप्त केले. यावेळी मोठा भाऊ व मोठी बहीण यांच्या विवाहानंतर सन २००९ साली आपला विवाह केला.
याचदरम्यान सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पहिल्यांदाच २०१८ साली किहीम ग्रामपंचायत सदस्य म्हणून चोंढी मतदार संघातुन निवडणूक जिंकून त्यांनी आपल्या मतदार संघातील जनतेची सलग ५ वर्षे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य सेवा आदी सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी पिंट्या गायकवाड यांनी कोरोना काळातील केलेली सर्व प्रकारची वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका मदत, अन्नधान्याची मदत, कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी केलेली मदत तसेच कोरोना काळाच्या अंतिम टप्प्यात किहीम ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आले होते, त्यावेळी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता वाऱ्यावरती सोडले होते, त्यावेळी त्याने किहीम ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वतःच्या खर्चाने टँकरने पाणीपुरवठा केला होता.
कोणत्याही क्षणी, कोणत्याही ठिकाणी, कोणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या अश्या कार्यकर्त्याला तसेच तो आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अनेक प्रकारची विकासकामे करीत असलेल्या या कार्यकर्त्याची नागरिकांना ‘जाण’ होती तसेच त्यांना पाठिंबा देखील मिळत गेला. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी गेल्या वर्षी २०२३ च्या किहीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून येत बाजी मारली. सरपंच पदावर निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात ‘आपल्या हक्काचा माणूस’ म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांसोबत सर्वांनीच जल्लोष साजरा केला.
पिंट्या गायकवाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकीर्दीत किहीम ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामांची शासन स्तरावर मंजुरी मिळविली आहे, त्यामध्ये काही विकासकामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने चोंढी येथील आदिवासी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, कामथ येथील रस्ता खडीकरण करणे, चोंढी येथील आदिवासी स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभिकरण करणे, बामणसुरे येथील नदीपात्रातील गाळ काढणे, पे अँड पार्क समुद्रकिनारी संरक्षण भिंत बांधणे, भिलेश्वर मंदिर येथील पिंडदान शेडची दुरुस्ती करणे, सार्वजनिक विहीर ते अंगणवाडी कामथ गटार बांधकाम करणे, किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंतर्गत रस्त्याच्या कडा साफसफाई करणे, किहीम येथील भिलेश्वर तलाव येथील विहीर दुरुस्त करून फिल्टर प्लांट बसविणे अशी अनेक विकासकामे केली व काही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे.
त्यांनी आजपर्यंत प्रत्येक कार्यात व प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक सामाजिक व राजकीय, शासकीय पुरस्कार मोठ्या सन्मानाने मिळाले आहेत. आपल्या किहीम ग्रामपंचायतीचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणार असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.
आज सर्वसामान्यांच्या मनातील हक्काचा माणूस तसेच गोरगरिबांचा कैवारी असलेला हा सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिकांना प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देत आहेत, रस्ते, पाणी, वीज तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा प्रत्येक कार्यात व त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा असलेला सहभाग उल्लेखनीय आहे, असे त्यांचे चाहते व सर्वसामान्य जनता आजही मोठ्या अभिमानाने सांगत असल्याचे सातत्याने ऐकण्यास मिळत आहे.
या सामाजिक कार्यकर्ता तथा किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड यांचा आज १६ डिसेंबर २०२४ रोजी ३७ वा वाढदिवस साजरा करत ते ३८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा….!!
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.