कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या अडमुठेपणामुळे रखडला असुन तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे या मार्गांवरून येणारे जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग, प्रवाशी नागरिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन यामुळे एखादा मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थ यांच्या कडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा हायवे वरील पुई हद्दीतील महिसदरा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरु आहे.या महामार्गांवरून या पुलाच्या बाजूनी गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता मुंबई गोवा हायवेच्या कामामुळे रखडला आहे. तसेच पावसाळा जवळ आला तरी गोवे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या अडमुठे धोरणामुळे अद्याप ही पूर्ण होऊ शकला नाही.
मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील चौदारीकरणाच्या कामाला १७ वर्षे पूर्ण झाल्या नंतर कोलाड परिसरातील रस्ता करण्यासाठी ठेकेदाराला जाग आली आहे तर हे काम कोणत्याही ग्रामस्थांचा विचार न करता ठेकेदाराच्या मनमानी नुसार सुरु आहे. ठेकेदाराच्या मनमानी नुसार रस्त्यावर भराव टाकण्याचे काम सुरु आहे. परंतु या भरावामुळे मुंबई-गोवा महामार्गांवरून गोवे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. याविषयी गोवे ग्रामस्थ यांनी आंदोलन केले होते. यानंतर हा रस्ता लवकरच लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार यांनी गोवे ग्रामस्थांना दिले होते. परंतु पावसाळा सुरु होण्यासाठी १५ ते २० दिवस शिल्लक राहिले असतांना रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.
मुंबई-गोवा चौपादरीकारणासाठी किती जागा संपादीत करण्यात आली आहे. याची माहिती घेऊन पूर्ण भराव केला पाहिजे होता यामुळे मुंबई -गोवा हायवे वरुन असंख्य गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु नियोजन शुन्य असल्यामुळे लोकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. जबाबदार कोण? अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.