किल्ले रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन . सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यसह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगडावर हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला.
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या मार्फत गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यावर्षी देखील किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देशभरातून आलेल्या शिवभक्तांच्या तोंडून छ.शिवाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी , असा नारा दिला जात असल्याने संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर दुमदुमून गेला. जिकडे तिकडे हातात भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले झेंडे दारी शिवभक्त दिसून येत होते. पहाटेच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील उठून दाद दिली. यामुळे गडावर शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. यावेळी छ.शिवाजी महाराज यांची पालखी वाजत गाजत राजसदर येथे आणण्यात आली. राजसदरेवर छ.युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेख करण्यात आला. यावेळी पंच जल कुंभातील पाणी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छ.संभाजी राजे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नाण्यांचा अभिषेख करण्यात आला आणि समोरील शिवभक्तांनी छ.शिवरायांचा एकच जयघोष केला.
यावेळी याठिकाणी युवराज संभाजी राजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार मंगेश चव्हाण, माझी आमदार अनिकेत तटकरे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार प्रभाकर देशमुख, आमदार बच्चू कडू, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, संभाजी ब्रिगेड चे प्रवीण दादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात छ.युवराज संभाजी राजे यांनी ज्या मातीला छ.शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाला आहे. त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे तो केवळ या छ.शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे असे स्पष्ट करत रायगड संवर्धन हि काळाची गरज आहे असेही स्पष्ट केले. यावेळी युवराज संभाजी राजे यांनी राजकीय भाष्य फार केले नाही. गड किल्ले हा आपला खरा वारसा आहे तो जतन झालाच पाहिजे असेही स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती. किल्ले रायगड तसेच रायगडाचा पायरी मार्ग आणि पाचाड येथे आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सुविधा उभी करण्यात आली होती यामध्ये जवळपास 3 हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले. पाचाड येथे तीसहून अधिक रुग्णवाहिका उपलब्ध केल्या गेल्या होत्या अशी माहिती डॉक्टर भाग्यरेखा पाटील आणि डॉक्टर संध्या रजपूत यांनी दिली.
सहा जून रोजी साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांसाठी पाचाड व कोंजर येथूनच एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती मात्र पोलिसांनी किल्ले रायगड परिसरात असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण केली होती यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबाबत बद्दल स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून आली आम्ही स्थानिक असताना व आम्ही काम धंदा निमित्त तसेच भाजीपाल्यासाठी महाड येथे जातो परंतु आम्हाला आमच्या घरी जाताना पोलिसांकडून नाहक अडवणूक केल्याने स्थानिक ग्रामस्थ प्रशासनावर नाराज झाले आहेत.
प्रहार कडून रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रहार संस्थेच्या वतीने आमदार बच्चू कडू हे स्वतः पाच जून रोजी किल्ले रायगडावर दाखल झाले होते. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान आलेल्या हजारो शिवभक्तांनी रक्तदान करून राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद व्यक्त केला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.