किल्ले रायगडावर भटके श्वान आणि गुरे  बंदिस्त करण्याची प्रथा राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सुरू ! पशूंची होतय हेळसांड 

Dog Aarest Raigad
महाड ( मिलिंद माने ) :
सन २०२१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड वर आगमन झाले होते. जवळपास तब्बल ३५ वर्षानंतर राष्ट्रपती पद भूषवणारी व्यक्ती ही रायगडावर येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत चोख सुरक्षाव्यवस्था त्यावेळी ठेवण्यात आली होती. या सुरक्षिततेच्या कारणास्तव परिसरातील भटके श्वान आणि गुरे यांना देखील त्यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत पकडून बंदिस्त करून ठेवण्यात आले होते.
तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या दौऱ्यानंतर अशा पद्धतीची जणू काही प्रथाच पडली असल्याचे आता दिसून येत असून येत्या ६ जून आणि २० जून रोजी किल्ले रायगडावर 351 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. निमित्ताने गडावर अनेक महत्त्वाच्या आणि अति महत्त्वाच्या व्यक्ती येण्याची शक्यता असल्याने पुन्हा प्रशासनाने या परिसरातील पाळीव श्वान पकडण्याचा आणि भटकी गुरे बंदिस्त करण्याचा हुकूम काढला असून ही जबाबदारी पशुवैद्यकीय खात्यास देण्यात असल्याचे समजते आहे. वास्तविक श्वानांना पकडण्यासाठी महानगरपालिका, नगरपरिषद ज्या पद्धतीने प्रशिक्षित श्वान पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वापर करते त्याच धर्तीवर किल्ले रायगड परिसरात देखील अशा पद्धतीनेच काम करणे उचित ठरले असते परंतु याबाबतीत मात्र प्रशासन गंभीर नसून तोकड्या उपलब्ध पर्यायाचा वापर करीत पशुवैद्यकीय खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागत असल्याचे समोर आले आहे.
किल्ले रायगड परिसरात पाळीव प्राणी व भटके कुत्री पकडत असताना यामध्ये या पशूंची आणि श्वानांची प्रचंड हेळसांड होणार असून त्यांचा चारा तसेच खाण्यापिण्याचा व आरोग्याचा प्रश्न देखील उद्भवणार आहे. वास्तविक पाहता किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा हा वर्षानुवर्ष होत आहे परंतु आजपर्यंत कधीही अशा पद्धतीने भटके श्वान अथवा गुरे पकडण्याची गरज भासली न्हवती मग आत्ताच हा उद्योग का? पुन्हा एकदा भारीतल्या शुक्राचार्यांनी चालू करण्याचे कारण काय असा सवाल स्थानिक ग्रामस्थ राज्य शासनाला विचारीत आहेत तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड भेटीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आपण समजू शकतो की मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असते आणि त्यांचे काही सुरक्षा निकष असतात त्या पद्धतीने कार्यवाही करावी लागते परंतु प्रत्येक वेळी या मुक्या प्राण्यांना पकडून त्यांना डांबून ठेवण्यात काय अर्थ असा सवाल या परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे.
आजपर्यंतच्या इतिहास पाहता किल्ले रायगडावरील कार्यक्रमादरम्यान कधीही कुठल्याही पर्यटक अथवा शिवभक्तावर श्वानांनी अथवा गुरांनी हल्ला केल्याची घटना कधीही घडलेली नाही. मग आत्ताच अशा पद्धतीची व्यवस्था करण्याची गरज काय ? जर या बाबी अत्यावश्यक असतीलतर त्या ठिकाणी अत्यंत तज्ञ पथकाची नियुक्ती करून कार्यक्रम संपेपर्यंत त्या पशु आणि श्वानांच्या उत्तम देखभालीची हमी प्रशासनाने घेणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.अशा प्रकारे प्राण्यांच्या होणाऱ्या बंदिस्तीवर प्राणी मित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading