रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी पुणे येथून थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या आठवड्यात काशीद समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या दोन घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे (३१ वर्षे) त्यांच्या तीन मित्रांसह पुण्याहून भाडोत्री रिक्षा घेऊन काशीद येथे फिरण्यासाठी आले होते. पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या प्रतिक यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडाला. त्यांच्या मित्रांना वाटले की तो पाण्यातून बाहेर आला असेल, परंतु प्रतिक एक तासानंतर पाण्यात तरंगताना आढळून आला. लाईफगार्ड आणि पोलिसांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
काशीद समुद्रकिनाऱ्यावर हजारो पर्यटक वर्षभर येतात; मात्र, येथे सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधा, जीर्ण टेहळणी टॉवर, सायरनचा अभाव आणि कमी सुरक्षा रक्षकांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून नागरिकांतूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुरुड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार हरि मेंगाळ करत आहेत.
ही घटना काशीद समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा ढिसाळपणा अधोरेखित करत असून प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.