श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या कार्ले नदी लगत असणाऱ्या विहिरींच्या परिसरातील नदी पात्रामध्ये अवैधरित्या खोल खड्डे खणून रेजग्याचा उपसा होत असल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ होण्याबरोबरच नदीपात्रालगत गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरींमधील पाण्याची पातळीसुध्दा कमी होत असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
या नदीपात्राला लागून बोर्ली पंचतन, दिवेआगर आणि भरडखोल ग्रामपंचायतींनी आपापल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी बांधल्या असून उन्हाळ्यामध्ये या विहिरींची पाणी पातळी वाढून गावांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या कार्ले धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येतं.परंतु नदीपात्रामध्ये अवैध रेजग्याचं उत्खनन, विविध व्यावसायिकांद्वारे होणारा पाण्याचा उपसा, गाड्या धुणे यामुळे याचा एकत्रित परिणाम या तीन गावांच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे.
काही व्यावसायीक स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध रेजगा व पाण्याचा करीत असलेला उपसा यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडत असून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होण्याबरोबर पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. याचा गांभीर्याने विचार करुन नदीपात्रात अवैध रेजगा व पाण्याचा उपसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी असे आवाहन बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे प्रशासक किशोर नागे व ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर यांनी महसूल प्रशासनाला केलं आहे.
बोर्ली पंचतन गावाची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारा विस्तार यामुळे पाण्याची वाढती मागणी व एप्रिल मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई याचा भविष्याच्या दृष्टीने विचार करून एखाद्या नवीन धरणाची उभारणी करण्याच्या नियोजनासाठी आत्तापासूनच पावलं उचलणं गरजेचे असल्याचं मत बोर्ली पंचतन ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.