तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वर्णे, तिघर नांगुर्ले येथील शेतकऱ्यांना कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून राजकीय सहकार्यातून अरेरावी, दादागिरी केली जात असल्याचे मत पीडीत शेतकऱ्यांनी वर्णे येथील हनुमान मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. साधारणपणे येथील १४ पीडित शेतकऱ्यांची शेत जमीन ही कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाच्या सीमेलगत असून, शासकीय मोजणी करूनच कल्पतरू कंपनीने सीमा बंदी कराव्यात, मध्यभागी असलेल्या शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी रस्ता तसेच तिन्ही गावाची ग्रामदेवी वरणाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा मागणीसाठी पीडित शेतकरी यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्जत तहसीलदार यांना लेखी पत्र दिले असून, मात्र तहसीलदार यांच्या स्तरावरून कोणतीच कारवाई केली नसल्याचे मत येथील शेतकरी यांनी बोलताना व्यक्त करत राजकीय अदृश्यशक्तीच्या दबावाखाली मात्र शासकीय अधिकारी तथा सरकारी बाबू कल्पतरू गृहप्रकल्प कंपनीवरती कारवाई न करता मेहरबान आहेत का? असा प्रश्न शेतकऱ्यानी उपस्थित केला आहे.
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वर्णे, तिघर नांगुर्ले येथील सूरू असलेल्या कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाच्या मनमानी कारभारा विरोधात १४ पीडित शेतकऱ्यांनी दि. ०३ जून २०२४ रोजी वर्णे येथील हनुमान मंदिरात न्याय हक्कासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पांडुरंग शिर्के यांनी सुरुवातीला उपस्थित पत्रकारांचे आभार मानत शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडावी अशी विनंती करत, कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्प आमच्या गावावर आला त्याचा आम्हाला आनंद होता, आम्हा स्थानिकांना रोजगार मिळेल अशी आशा होती मात्र आमची भ्रम निराशा झाली. तर वर्णे,तिघर, नांगुर्ले येथील आम्ही शेतकरी आमच्या वडील पार्जित जमीन कसित असल्याचे व कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाच्या चतूर्सिमेवरील आम्ही चौदा शेतकरी असून, मात्र कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाकडून जागेच्या हद्दकायम मोजणी संदर्भात शासकीय मोजणी बाबतच्या कोणत्याच नोटीस आम्हा पीडित शेतकऱ्यांना न बजावता नियम बाह्य प्रायव्हेट सर्वेनुसार दीड वर्षे त्यांचा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.
मात्र आता सीमेलगत असलेल्या आमच्या शेत जमिनीमध्ये संरक्षण भिंतीचे बांधकाम करायला सुरुवात केली , या संदर्भात आम्ही पीडित शेतकऱ्यांनी दि. ०९ फेब्रुवारी २०२४ व दि. ३१ मे २०२४ रोजी कर्जत तहसिलदार यांच्या कडे दोन तक्रारी अर्ज केले. मात्र कर्जत तहसिलदार यांच्या स्तरावरून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. तर आम्ही शासकीय मोजणी करून हद्दकायम करून संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याचे सुचना कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पाला केल्या होत्या मात्र दोनच दिवसांपूर्वी २५ ते ३० जणांचा जमाव आमच्या शेताच्या बांधावर आल्याचे कल्पतरू गृहनिर्माण कंपनीला अदृश्य राजकीय शक्ती व प्रशासकीय अभय असल्याने बेछूटरित्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रम करू पाहत आहेत. तेथे काही फोन आम्हाला येत आहेत. त्यामध्ये स्थानिक आमदार यांचे बंधू मनोहर थोरवे यांनी सुद्धा फोन करून आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांना सांगितले की आमचा व कंपनीचा जो काही वाद आहे आम्ही तो पाहून घेऊ तुम्ही त्यात लक्ष घालू नये अशी त्यांना विनंती केली.
तसेच रितसर सरकारी सर्वे केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू करू नका असे ही सांगितले . तर भविष्यात शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दादागिरी करणाऱ्या लोकांपासून धोका असल्याने, याबाबत रीतसर पत्र पोलीस स्टेशन कर्जत यांना दिले आहे मात्र अद्यापही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे व कंपनीने रीतसर सर्वे करावा एवढी मागणी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मध्यभागी आहेत त्यांना रस्ता द्यावा तसेच तिन्ही गावांची वरणाई माता मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी आमची मागणी असल्याचे पीडित शेतकरी पांडुरंग शिर्के यांच्या कडून सांगण्यात आले.
ॲड.राजेंद्र निगुडकर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलताना त्यांना पत्रकारांनी राजकीय अदृश्य शक्ती कोण असा प्रश्न विचारला असता, आमदार महेंद्र थोरवे यांचे नांव घेत या सर्व अन्यायाच्या मागे आमदार थोरवे असल्याचा घणाघाती आरोप करत, तहसीलदार यांची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांना अडचणी असतील तर त्या सोडवाव्यात मात्र प्रशासन राजकीय दबाव खाली जर काम करत असेल राजकीय हेतूने काम करत असेल, तर त्यांनी विचार बदलून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. कोणती अदृश्य शक्ती कंपनीच्या मागे आहे. जमीन मोजणी करून हद्द निश्चित करून काम करावे मध्यभागी असलेल्या शेतकऱ्यांना रस्ता द्यावा. दिनेश नरे या शेतकरयांना वीट भट्टी , शेतीकडे जाण्यासाठी त्यांना रस्ता लागणार आहे त्यांना रस्ता द्यावा वरणाई मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता द्यावा ही सुद्धा मागणी आम्ही लावून धरलेली आहे. अशा मागणीचे पत्र आम्ही तहसीलदार यांना दि. ०९ फेब्रुवारी रोजी दिलेले आहे.
वास्तविक तहसीलदार यांनी स्थळ पाहणी करून निर्णय घेणे आवश्यक होत. आज पाऊस कधी पडायची वेळ आली तरी पेरणी सुरू होऊ शकते मात्र तहसीलदार शेतकऱ्यांना न्याय न देता तहसीलदार कोणाचे काम करीत आहेत. तहसीलदार हे धनदांडगे आणि भांडवलदारांसाठी आहेत का? राजकीय दबाव खाली काम करीत आहेत का? भविष्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर याला जबाबदार कोण? येथे प्रचंड उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावात गुंडगिरी करत असाल तरी आमचे पाचही गाव एकत्र आहेत. दादागिरी एक दिवस कराल मात्र दुसऱ्या दिवशी दादागिरी चालणार नाही.पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण शासन दरबारी आमचे म्हणणे पोहोचवावे.
या पत्रकार परिषदेत ठिकाणी आणखी एक धक्कादायक खुलासा असा की शासकीय व्यायाम शाळा कल्पतरू कंपनीने जमीनदोस्त केलेली आहे. प्रशासन मात्र ढिम्म होऊन याकडे पाहत आहे. संबंधित ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद यांचे अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देतील का अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तर आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सनदशीर मार्गाने उपोषण व जन अंदोलन छेडणार असल्याचे उपस्थित पीडित शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.